उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती जाण्याची शक्यता होती. मात्र हे सर्व अंदाज आता फोल ठरले आहेत. अशात आता मुख्यमंत्री पदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आज संध्याकाळी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
दरम्यान महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी 24 तासात दोन वेळा कॅबिनेटची बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मात्र महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असताना आणि राज्यपालांनी पत्र दिले असताना कॅबिनेटमध्ये घेतलेले निर्णय अवैध असल्याचं मोठं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय अवैध असले तरी यातील बऱ्याच निर्णयांशी आम्ही सहमत आहोत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते यांची राजभवनात आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत राज्यातील मोठी सत्तांतरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असणार अशी घोषणा केली. तसेच आपण मंत्रिमंडळाच्या बाहेर राहून काम पाहणार असल्याचे जाहीर केले.
#WATCH via ANI multimedia | Eknath Shinde to be the new Chief Minister of Maharashtra, says BJP leader Devendra Fadnavishttps://t.co/CzKrxlZtHY
— ANI (@ANI) June 30, 2022
नामांतरणाच्या मुद्द्यावर फडणवीस काय म्हणाले?
नामांतरणाच्या मुद्द्यावर फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने विकासाची काम न करता भ्रष्टाचार केला. राज्याच्या इतिहासात दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये जाणं ही आश्चर्याची आणि खेदाची बाब होती. बाळासाहेब ठाकरेंनी दाऊदचा आयुष्यभर विरोध केला, मात्र उद्धव ठाकरेंनी दाऊदशी संबंध असलेल्या व्यक्तींना मंत्री केले. तुरुंगात गेल्यानंतरही त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले नाही. रोज सावरकर हिंदुत्वाचा अपमान, ठीक आहे. शेवटच्या दिवशी औरंगाबादचे नामांतरण संभाजीनगर झाले, पण कधी… राज्यपालांच पत्र आल्यावर कॅबिनेट घ्यायची नसते. तरीही कॅबिनेट घेऊन संभाजीनगर, धाराशीव, दि.बा.पाटील हे निर्णय घेतले. अर्थात हे निर्णय आमच्या सरकारला पुन्हा घ्यावे लागणार आहे. कारण ते वैध मानले जाणार नाही. पण ते आम्ही घेऊ…
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजप-शिवसेना युतीला मतदान केले, मात्र सेनेने जनादेशाचा अवमान केला आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे रोज हिंदुत्वाचा अपमान करतात. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात विकास झाला नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधकांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. बाळासाहेब काँग्रेसच्या विरोधात राहिले, पण त्यांनी त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. लोकांना भाजप शिवसेनेचे सरकार हवे होते, पण उद्धव यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्राधान्य दिले. हे सरकार (महा विकास आघाडी) आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, असे मी तुम्हाला नेहमी सांगत होतो.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, शपथविधी सोहळा संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. आज शपथविधी सोहळ्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून शिवसेना आणि भाजपचे नेते शपथ घेणार आहेत. मी सरकारमधून बाहेर पडेन. सरकार नीट चालेल याची जबाबदारी माझी असेल. हा लढा सत्तेसाठी नसून हिंदुत्वासाठी आहे. पुन्हा एकदा हिंदुत्ववादी विचाराचं आणि बाळासाहेबांनी मांडलेलं हिंदुत्व, भाजप हिंदुत्व मांडतंय. मोदींनी जे व्हिजन दाखवलं ते पुढे नेणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितलं.