केंद्र सरकार महाराष्ट्राला पूर्णपणे मदत करतंय. त्यामुळे राज्यातील ठाकरे सरकारने रोज सकाळी उठून कांगावा बंद करावा, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अंधेरी येथे कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी लसीकरणावर देखील भाष्य केलं. राज्य सरकारनं लसीकरणाची आपली दिशा ठरवली पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.
“केंद्र सरकारने जवळजवळ १० दिवसांकरिता १६ लाखांचं उत्पादन होतं, त्यापैकी ४ लाख ३५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला दिले आहेत. सर्वात अधिक कोटा हा महाराष्ट्राला दिला आहे. यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळेल. तर ऑक्सिजन संदर्भात केंद्र सरकारने १ हजार ७५० मेट्रिकटन एवढं ऑक्सिजन महाराष्ट्राला दिलं आहे. खरं तर याची तुलना करु नये पण जे बोलघेवडे लोकं सातत्याने केंद्र सराकरवर टीका करतात त्यांना सांगू इच्छितो की इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला ऑक्सिजनचा दुप्पट कोटा दिला आहे. ११०० व्हेटिलेटर्स केंद्राने महाराष्ट्राला दिले आहेत. आजही भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपकरणे महाराष्ट्रात पोहोचले आहेत. जे कांगावेखोर आहेत, त्यांना सांगू इच्छितो की, केंद्र सरकार पूर्णपणे मदत करतंय. राज्य सरकार त्यांच्यापरिने काम करतंय. त्यामुळे दररोज सकाळी उठून कांगावा करणं बंद करावं,” असं देवेंद्र पडणवीस म्हणाले.
लसीकरणात मविआत एकवाक्यता नाही
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर लसीकरणावरुन निशाणा साधला. प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार आहे. १०० टक्के भारतीयांना मोफत लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने व्यवस्था उभी केली आहे. त्या व्यवस्थेतून लसीकरण केलं जाणार आहे. मात्र, राज्यातील मंत्र्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्या का येत आहेत? याची कल्पना नाही. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या डिलीट केलेल्या ट्विटवर बोलताना ट्विट्स करुन पुन्हा का डिलीट केले जातात, याबाद्दल कल्पना नाही आणि मी याविषयी बोलणार नाही, असं फडणवीस म्हणाले.