घरCORONA UPDATECorona: सरकारनं मुंबईतील ९५० मृत्यू दडवले? देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

Corona: सरकारनं मुंबईतील ९५० मृत्यू दडवले? देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

Subscribe

मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या जशी वाढतेय, त्याचप्रमाणे कोरोनामुळे होणारे मृत्यू देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. आजघडीला मुंबईत कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा २२००च्याही वर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने मुंबईत झालेल्या मृतांचा खरा आकडा लपवल्याचा दावा माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक कोरोना मृत्यू का दडविण्यात आले? इतके अक्षम्य दुर्लक्ष का? आणि असे करणार्‍यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्रच लिहिलं आहे.

आपल्या पत्रात ते म्हणतात की, ‘सुमारे ९५० हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला तर हा प्रकार अतिशय जीवघेणा आणि धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे ४५१ अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले. तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणे नॉन-कोविड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले, असे सारेच प्रश्न निर्माण होत आहेत’.

- Advertisement -

प्रकार लपवण्याचा दुबळा प्रयत्न!

दरम्यान, ही चूक लपवण्याचा दुबळा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचं देखील फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे. ‘ही बाब उघडकीस आल्याने हे प्रकरण दडपण्यासाठी एक पत्र शासनाने पाठविले असून, त्यात कोरोनासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी अपडेट करायची आहे, ती तातडीने पाठवा, असे त्यात म्हटले आहे. असे करून झालेला प्रकार जाणूनबुजून लपविण्याचा दुबळा प्रयत्न होताना दिसून येतो आहे. आयसीएमआरकडून ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली आहे. तपासणी करून ३५६ अपात्र ठरविलेले कोरोना मृत्यू आणि काही तपासणीसाठी प्रलंबित ठेवलेली प्रकरणे असे मिळून सुमारे ४५१ मृत्यू हे कोविड मृत्यू आहेत आणि आता ते पोर्टलवर तत्काळ नोंदविले गेले पाहिजेत. आयसीएमआरचे स्पष्ट दिशानिर्देश असताना आणि कोरोनामुळे मृत्यू झालेले असताना सुद्धा ते कोरोना मृत्यू नाहीत, हे ठरविण्याचा अधिकार समितीला दिला कुणी? कोणते मृत्यू हे कोरोना मृत्यू नाहीत, याबाबत तीन वर्गवारी स्पष्टपणे आयसीएमआरने दिल्या आहेत. पण, येथे मनात येईल, त्याप्रमाणे कोरोनाचे मृत्यू कोरोना नसल्याचे ठरविण्यात आले आहे. ही बाब केवळ अक्षम्य दुर्लक्षाचीच नसून गुन्हेगारी स्वरूपाच्या कटात मोडणारी आहे, हे मला दुर्दैवाने नमूद करावे वाटते’, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

devendra fadnavis letter

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस या पत्रात पुढे म्हणतात की, ‘अशीही माहिती मिळाली आहे की, सुमारे ५०० अशी प्रकरणे आहेत, जी विविध रूग्णालयांनी मृत्यू झाल्यानंतर ते सारे मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे म्हटले आहे. पण, ती प्रकरणे ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे सादरच करण्यात आलेली नाहीत. यात सुद्धा कुणाचा दबाव होता आणि नसेल तर असे न करणार्‍यांवर राज्य सरकार काय कठोर कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. हे दोन्ही प्रकार अतिशय गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -