राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने राज्यात ब्रेक दि चैन या धोरणानुसार राज्यात नवे निर्ंबध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये विकेंड लॉकडाऊन तर इतर दिवशी रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये सरकारने जे निर्बंध जारी केले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याचपार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
कठोर निर्बंधांमुळे जनमानसात अस्वस्थता आहे. सर्व घटकांशी चर्चा करुन पुन्हा नव्यानं अधिसूचना जारी करा, असं देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे, असं फडणवीस यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे. पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनालारोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल, असं फडणवीस यांनी त्यांच्या पत्राद्वारे विनंती केली आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ पाऊले उचलून छोटे व्यवसायी, सामान्यांना दिलासा देण्याबाबत, तसेच सर्वच घटकांशी चर्चा करून पुन्हा नव्याने अधिसूचना जारी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/1U9LuvklhW
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 6, 2021
काय म्हटलंय पत्रात?
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शवली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश्य निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करताहेत.
हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठआफटका बसत असून, अर्थव्यव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहते हा एकप्रकारे अघओषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरण द्यायचे झावे तर वाहतूक खूली ठेवताना गॅरेजआणि स्पेअर पार्ट्स दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.
त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बंधांबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनालारोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो.