मेळघाट येथील हरीसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनं राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, आता या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. आंदोलनं केल्याशिवाय सरकार हलत नाही. प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव करण्याचा या महाविकास आघाडी सरकारचा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी वन अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कारवाई करा, अशी मागणी करणारं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी लिहिलेलं पत्र ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे.
दीपाली चव्हाण प्रकरणात चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकार्यांची तत्काळ नियुक्ती करा, जलदगती न्यायालयात खटला चालवा आणि विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करा ❗️ pic.twitter.com/Ix3o7oFukO
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 2, 2021
“अवघ्या २८ वर्षांच्या वनपरीक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, आरोप ज्यांच्यावर आहेत, त्यांची केवळ बदली होते. आंदोलनं झाल्यानंतरच अपर मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांचे निलंबन होते. खरे तर फौजदारी कारवाई सुरू असताना खातेनिहाय चौकशी आवश्यक असते. पण, तसे आदेश न काढता अंतर्गत चौकशी समिती नेमण्याचा घाट. प्रत्येक टप्प्यासाठी आंदोलन. त्याशिवाय सरकार हलत नाही. आम्हाला प्रश्न पडला आहे की, प्रत्येक आरोपित व्यक्तीचा बचाव-संरक्षण करण्याचाच या मविआ सरकारचा अट्टाहास का?” असं ट्विट फडणवीस यांनी केलं.