घरमहाराष्ट्रआता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही बसू देणार नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंना...

आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही बसू देणार नाहीत, फडणवीसांचा ठाकरेंना टोला

Subscribe

मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचाच भगवा फडकेल. पण कोणती शिवसेना? बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आणि शिंदेच्या नेतृत्त्वातील शिवसेना. या शिवसेनेसोबत निवडणूक लढवून भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुंबई – मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प भाजपाने घेतला आहे. आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का? तोच उत्साह, तोच जल्लोष, तीच संस्कृती, तीच परंपरा! पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं हे आपण सगळ्यांनी बघितलं. काल दहीहंडी जोरात झाली. आता आता गणेशोत्सव, नवारोत्सवसह सर्व सण जोरात करायचे आहे. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असा उपरोधिक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. ते आज भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

मुंबई महापालिकेवर शिवसेना-भाजप युतीचाच भगवा फडकेल. पण कोणती शिवसेना? बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आणि शिंदेच्या नेतृत्त्वातील शिवसेना. या शिवसेनेसोबत निवडणूक लढवून भगवा महापालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आता थांबायचं नाही…, पालिका निवडणुकीसाठी फडणवीसांनी फुंकले रणशिंग

आशिष शेलार तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात, जाणणारेही आहात आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहात. त्यामुळे आता आपल्याला महानगर पालिकेत मुंबई विकास लीग सुरू करायची आहे. मुंबईतील विकास कामे करताना आपल्याला अनेक अडचणी येतील. अडथळे येतील. पण, आशिषजी तुम्ही फुटबॉलची अनेक मैदाने तयार केली आहेत. त्यामुळे अडचणींना किक कशी मारायची हे तुम्हाला माहिती आहे. अनेक उड्या मारणारी लोकं आहेत. दोरी उड्या असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्षच आशिष शेलार आहेत. त्यामुळे कोणाला किती उडू द्यायचं आणि दोरी खेचायची ह्याचीही तुम्हाला कल्पना आहे. आशिष शेलार यांनी मागच्या वेळी जो स्ट्राईक रेट दाखवला तो दुप्पटीहून अधिक होता. ३५ वापरून ८२ वर गेलो. आता स्ट्राईक रेट मागच्यापेक्षा जास्त असला पाहिजे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी आशिष शेलार यांची पाठही थोपटली आणि त्यांना येत्या निवडणुकीसाठी टार्गेटही दिलं.

- Advertisement -

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात, गोविंदा आरक्षणावरून अजित पवारांचा सल्ला

मुंबईकरांना हक्काचं घर देणार

येत्या तीन महिन्यात धारावीतील सर्व अडथळे दूर करून धारावीकरांना स्वप्नातलं घर देणार. एअरपोर्ट लॅण्डवरही अनेक झोपडपट्ट्या आहेत, त्यांचाही संघर्षही आम्ही टोकाला नेऊ. बोरिवली, कांदीवली, या भागात अनेक झोपडपट्ट्या आहेत. ज्या केंद्र सरकारच्या लॅण्डवर आहेत. त्यासंदर्भातही ज्या अडचतणी असतील त्या दूर करू. आपलं सरकार मुंबईतील गरिबाला आणि झोडपडट्टीत राहणाऱ्या त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणार. ज्यांच्या इमारती पुनर्वसनसाठी असून ज्यांना भाडं मिळत नाहीत, त्यांना भाडं देण्यासाठीही प्रयत्न करणार. ज्या इमारती किंवा चाळींची विकासकामे रखडली आहेत, ती कामं येत्या काळात पूर्ण करणार, असं आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना दिलं.

सामान्य जीवनातील माणसाचं काम पूर्ण करायचं आहे. आशिष शेलार यांना बीसीसीआयच्या मार्केटिंग कमिटीत काम करायची संधी मिळाली. त्यांना आम्ही मार्केटिंग करायला सांगणार नाही आता. मात्र ज्यांच्याकरता काम करतोय ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी काम केलं पाहिजे.

मुंबईत दरवर्षी खड्ड्यांचं साम्राज्य

गेल्या २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. पण महापालिकेत भ्रष्टाचाराचा विळखा आहे. रोज कंपनी तयार व्हायची. तीच कंपनी सांगायची काय खरेदी करायचे. तेच वर्क ऑर्डर करायचे. मुंबईच्या सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही. पण केवळ आपल्या लोकांना कामं देण्याकरता सौंदर्यीकरणाचं काम करणं हे मुंबईकरांना धोका देण्यासारखं आहे. त्यापेक्षा मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न का सोडवला नाही असा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे. त्यामुळे मुंबईकरांना भ्रष्टाचाराच्या विळख्यातून काढलं पाहिजे. काही लोकांनी २५ वर्षे या मुंबईच्या भरवश्यावर आपलं पोट भरलं आहे. मुंबई महापालिका मूटभर लोकांची ठेवायची नाही. घराण्याची ठेवायची नाही. मुंबईकरांकरता बाळासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी आपली आहे. बाळासाहेबांच्या नावाने जे जिंकून आले त्यांनी स्वप्न पूर्ण केलं नाही.

उद्धव ठाकरेंची केली मिमिक्री

निवडणुका जवळ येतील तसे भावनिक मुद्दे सुरू होतील. मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणारा जन्मालाच आला नाही. मग हे लोक का गळे काढतात? हे म्हणतात मुंबई दिल्लीसमोर झुकणार नाही, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंची मिमिक्री केली. ‘पण मुंबईला दिल्लीसमोर कोणी झुकवलं? मुख्यमंत्री दिल्लीत गेले म्हणून शिंदे दिल्लीश्वरासमोर झुकले असं ते म्हणाले. दिल्ली ही पॉलिटीकल राजधानी आहे त्यामुळे तिथे जावंच लागेल. मग प्रकल्प होतील कसे? ते लोक दिल्लीत गेले नसतीलही पण सोनियांजीसमोर नतमस्तक होण्याकरता ठाकरे दिल्लीत गेले होते. त्यामुळे मुंबईही दिल्लीसमोर झुकणार नाही. पण मुंबईच्या हितासाठी जितक्या वेळा जावं लागेल तितक्या वेळा मी दिल्लीत जाणार,’ असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.


मुंबईमधील मराठी माणसाला विस्थापित केलं जाणार, अशी भिती पसरवली जाते. पण कोणी विस्थापित केलं? गिरगावमधला माणूस मीरा भायंदरसारख्या ठिकाणी गेला. तुमच्या पालिकेत हजारो कोरोडो रुपये होते तरी नागरिकांची यांनी कामं केली नाहीत. मात्र, आम्ही मेट्रोसारखी योजना आणून मराठी माणसाला तिथेच ठेवलं. आम्ही बीडीडी चाळीचा प्रश्न सोडवला. २०-२५ वर्षे सत्तेत राहून तुम्ही त्यांचा प्रश्न सोडवू शकला नाहीत. कारण तुमचा इंटरेस्ट बिल्डरांमध्ये होता. कोण किती देईल याकडे तुमचा इंटरेस्ट होता. पण आम्ही एका झटक्यात निर्णय घेतला आणि हा प्रकल्प म्हाडाकडे सुपूर्द केला. १८० चौ.फुटांच्या घरात राहणाऱ्यांना आम्ही ५०० चौ. फूटांचं घर दिलं. मराठी माणसाची लढाई लढणारे कोणी असले तर ते आम्ही आहोत, असंही फडणवीसांनी ठणकावून सांगितलं.

आम्हाला मराठीचा आभिमान आहे. प्रत्येक क्षेत्रिय अस्मितेला वेगळं वलय आहे. या भाषेने जगाला साहित्य दिलं. मराठीची रंगभूमी जगातील सर्वातं चांगली रंगभूमी आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी व्यक्तीलाही अभिमान आहे. शेवटच्या माणसाचा विकास हे आपलं ध्येय असेल, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -