मुंबई : सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्रमक भूमिका घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच, समाजसेवक अंजली दमानिया यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर आता स्वत: धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Dhananjay Munde On Anjali Damaniya Sandeep kshirsagar Suresh Dhas)
मंत्रालायात आज (28 जानेवारी) राज्यमंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याची मागणी करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानुसार, “मंत्रिपदाच्या राजीनाम्यावर मी उत्तर देणार नाही. अंजली दमानिया या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटल्या. या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी अजित पवारांसमोर जी कागदपत्र सादर केली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट उत्तर देतील. तसेच, हे उत्तर त्यांनीच द्याव अशी माझी इच्छा आहे”, असे धनंजय मुंडे म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागलेला नाही आहे. पोलीस त्याचा शोध घेत असून त्याला फरार घोषित केलं आहे.