Dhule : धुळ्यातील (Dhule) शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांगवी (Sangvi) गावात गुरुवारी (10 ऑगस्ट) संध्याकाळी आदिवासी दिनाचा बॅनर फाडण्यावरुन दोन गटांत तणाव निर्माण झाला होता. दोन्ही गटांकडून एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यात आल्यामुळे दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी या घटनेप्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल केले असून 10 संशयितांना 4 दिवसांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Dhule Two factions clash over banner tearing Crimes filed against 200 people 10 suspects in police custody)
हेही वाचा – मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाकडून नवाब मलिकांना उपचारासाठी दोन महिन्यांचा जामीन
आदिवासी दिनानिमित्त सांगवी गावात बॅनर लावण्यात आला होता. मात्र संध्याकाळी 6 च्या सुमारास हा बॅनर फाडण्यात आला. बॅनर का फाडले? असा जाब विचारल्यानंतर दोन गटात हाणामारी झाली आणि मोठा वाद निर्माण झाला. थोड्याच वेळात सांगवी आणि सारणपाडा या दोन गावांमधील नागरिक जमा झाले आणि त्यांनी एकमेकांवर तूफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे याठिकाणी दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
संतप्त जमावाची पोलिसांवरच दगडफेक
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत करण्याचे प्रयत्न केले, पण संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केली. त्यामुळे 15 पोलीस कर्मचारी आणि चार ते पाच स्थानिक नागरिक जखमी झाले. तसेच यावेळी वाहनांचेही नुकसान झाले. जखमी पोलीस आणि स्थानिक नागरिकांना उपचारांसाठी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा – दहशत माजवत पोलिसाला मारहाण प्रकरणाचा 16 वर्षांनी निवाडा; मुख्य आरोपीचा झालाय खून
10 संशयितांना 4 दिवसांनी पोलीस कोठडी
पोलिसांनी दगडफेक प्रकरणी दोन्ही गावातील तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील 70 जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून यातील 13 जणांचा अटक करण्यात आली आहे. याशिवाय 10 संशयितांना 4 दिवसांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन्ही गावात सध्या तणावपूर्ण शांतता
सांगवी आणि सारणपाडा गावातील घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी आज पोलीस पथकासह सांगवी गावात रुट मार्च काढत अफवांवर विश्वास ठेऊ नका, असे आवाहन केले आहे. सध्या दोन्ही गावातील सर्व व्यवहार बंद असून संचारबंदीसारखी स्थिती आहे. याशिवाय ज्या ठिकाणी घटना घडली तिथे जिल्हा पोलीस दल आणि एसआरपीएफचा संयुक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, त्यामुळे दोन्ही गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.