मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली गावामध्ये सुरू असलेलं उपोषण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी 17 व्या दिवशी सोडलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी भेट देत मनोज जरांगे पाटलांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राज्य सरकारला एक महिन्यांची मुदत देत आणि आपलं उपोषण मागे घेतलं. याशिवाय त्यांनी मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे एकनाथ शिंदे यांना सांगितले होते. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी आता विरोधक सरकारवर टीका करण्याची संधी सोडत नाही आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणाला बसवल्याचा गंभीर आरोप रविवारी (17 सप्टेंबर) केला होता. यानंतर एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Chief Minister Eknath Shinde Manoj Jarange Patil hunger strike Nana Patole Congresss allegation)
हेही वाचा – मराठा आरक्षणासाठी नांदेडच्या तरुणाची आत्महत्या; जोपर्यंत पालकमंत्री येणार…
नाना पटोले यांना राज्यात कुणीही गांभीर्याने घेत नाही. त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावे, आंदोलनामागे शिंदेचा हात आहे का? असे आवाहन एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांनी दिले आहे. याशिवाय त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटलांनी माझ्या आवाहनाला मान देऊन उपोषण मागे घेतले आहे. सध्या मराठा आरक्षणासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. विरोधकांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे आहेत. पोलीस लाठीमारप्रकरणी त्यांनी माफी मागितली, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही
मराठा आरक्षणावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण मागत आहेत. त्यांची मागणी आहे की, जुन्या निजामकालीन दस्तांमध्ये कुणबी नोंद असेल तर व त्यात बदल असेल तर त्याचा सर्व्हे केला पाहिजे. खरंच कुणबी नोंद असेल तर मराठ्यांना आरक्षण देण्यास ओबीसींना आक्षेप नाही. परंतु सरसकट आरक्षण देण्यास ओबीसींचा विराेध आहे. त्यामुळे अशी कोणतीही भूमिका, राज्याची नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही. खरंतर सध्या जे आरोप करत आहेत, त्यांच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकले नाही, असा पटलवार एकनाथ शिंदे यांनी केला. मात्र यावेळी त्यांनी एका महिन्याचा शब्द पाळणार का? या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं.
हेही वाचा – तुम्ही इतर धर्मांवर बोलून दाखवा; सनातन धर्माच्या वादावर फडणवीसांचं आव्हान
नाना पटोले काय म्हणाले?
जालन्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना 31 तारखेला मध्यरात्री आंदोलक संतप्त झाले आणि 1 तारखेला दुपारी 3 वाजता गृहमंत्र्यांनी सौम्य लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले. यादिवशी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक सुरू होती. या बैठकीवरून लक्ष वळवण्यासाठी लाठीचार्जची घटना घडवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनीच मनोज जरांगे पाटलांना उपोषणाला बलवलं होतं, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे.