Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : 'मन की बात' आणि 'जन की बात'मध्ये फरक, उद्धव...

Uddhav Thackeray : ‘मन की बात’ आणि ‘जन की बात’मध्ये फरक, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना टोला

Subscribe

मुंबई : गावागावांमध्ये केंद्र सरकारच्या योजनांचे रथ अडविण्यात येत आहे. त्यामुळे जन की बात काय आहे? हे समोर येऊ लागले आहे. म्हणून मन की बात आणि जन की बातमध्ये खूप फरक असल्याचा टोला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. आज (ता. 06 फेब्रुवारी) मातोश्री येथे अजित पवार गटाचे पैठणमधील पदाधिकारी दत्ता गार्डे यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. दत्ता गार्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती शिवबंधन बांधल्याने आता पैठणमधील ठाकरे गटाची ताकद वाढली आहे. गार्डे यांनी प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. (Difference between ‘Mann Ki Baat’ and ‘Jan Ki Baat’, Uddhav Thackeray criticizes PM Narendra Modi)

हेही वाचा… BJP vs Thackeray group : ज्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे…, भाजपाने ठाकरे गटाला सुनावले

उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात कोकणाच्या किनारपट्टीवर दोन वादळं येऊन धडकली. पण आता महाराष्ट्रातील भगवे वादळ दिल्लीला आदळणार, हे भगवे वादळ हुकूमशाहीची चिरफाड करणारे आहे. अनेकदा बोलण्यात येते की, इंडिया आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे, पण त्याला पर्याय काय आहे? हुकूमशाहीला पर्याय द्यायचा नसतो. हुकूमशाही काढून फेकून द्यायची असते. मातोश्री आणि त्यासोबतच दौऱ्यावर असताना अनेक भाजपाचे लोक शिवसेनेसोबत येत आहेत. गावांत सरकारच्या योजनांचे रथ अडविण्यात येत आहेत. यावरूनच पंतप्रधान करत असलेले ‘मन की बात’ पेक्षा सामान्यांची ‘जन की बात’ वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे. जनतेची संकट वेगळीच आहेत. गेल्या 10 वर्षातील भाजपाचा भोंगळवाणा कारभार उघडा पडला आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

अनेक ठिकाणी गावागावात योजनाच पोहोचलेल्या नाहीत. हा भोंगळ कारभार संपवण्याठी सर्वजण शिवसेनेसोबत येत आहे. महाराष्ट्र आता यापुढे देशाची दिशा ठरवणार आहे, हुकूमशाहीला गाडणार आहे. मराठवाडा संतांची भूमी आहे, संतांच्या भूमीत गद्दारीला थारा नसतो. मी रायगड, सिंधुदुर्ग फिरलो. जसे मी कोकणात फिरलो, तसा मी मराठवाड्यात सुद्धा तुम्हाला भेटायला येणार आहे, संभाजीनगर, जालना आणि विदर्भात मी दौरा करणार आहे, असेही उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आले.

तर, गेले चार दिवस मी कोकण किनारपट्टी भागात कुटुंब संवादासाठी फिरत होतो. मागील चार दिवस मी कोकण किनारपट्टीवर दौऱ्याला होतो. कोरोना काळात राबवलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ यानुसार मी माझ्या कुटुंबासोबत संवाद साधत होतो. पहिल्या संकटात ज्याप्रमाणे माझे कुटुंब माझ्यासोबत होते, त्याप्रमाणे महाराष्ट्रावर आलेल्या दुसऱ्या संकटात माझे कुटुंब माझ्यासोबत आहे का, हे मी पाहतो आहे. महाराष्ट्र दौरा करून माझे कुटुंब माझ्यासोबत आहे का हे मला जाणून घ्यायचा आहे. महाराष्ट्रच देशाची दिशा ठरवणार आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.