घरमहाराष्ट्रएन. डी. पाटील अन् माझ्यात मतभेद, पण त्यांच्या विचारधारेशी ते प्रामाणिक- शरद...

एन. डी. पाटील अन् माझ्यात मतभेद, पण त्यांच्या विचारधारेशी ते प्रामाणिक- शरद पवार

Subscribe

राज्यातील तरुण पिढीने एनडी पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असंही शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. एन. डी. पाटलांच्या निधनानंतर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शरद पवार हे कोल्हापुरात गेले आहेत. त्यावेळी ते बोलत होते. एन. डी. पाटील हे डाव्या विचारधारेचे होते. त्या विचारधारेचं पालन करण्यासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं. व्यक्तीगत सुख दु:ख, घरदार याचा कधी विचार केला नाही.

कोल्हापूरः शेकापचे नेते एन. डी. पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्रावर शोककळा पसरलीय. अनेक राजकीय नेत्यांनी एन. डी. पाटलांना श्रद्धांजली अर्पण केलीय. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात जात त्यांचं अखेरचं दर्शन घेतलंय. आमच्यात मतभेद असल्याचं सांगत शरद पवारांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. एन. डी. पाटलांच्या जाण्याने कष्टकरी आणि शेतकरी समाजाचं मोठं नुकसान झालंय, आयुष्यभर एका विचारधारेला जपत त्यांनी त्यासाठी झोकून देऊन काम केलं, असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

राज्यातील तरुण पिढीने एनडी पाटील यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, असंही शरद पवारांनी आवर्जून सांगितलं. एन. डी. पाटलांच्या निधनानंतर त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शरद पवार हे कोल्हापुरात गेले आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
एन. डी. पाटील हे डाव्या विचारधारेचे होते. त्या विचारधारेचं पालन करण्यासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं. व्यक्तीगत सुख दु:ख, घरदार याचा कधी विचार केला नाही. शैक्षणिक चळवळीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अंतिम होता. एका बाजूने डाव्या विचारांनी सामान्य माणसाच्या हिताचं रक्षण करण्याचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूने कर्मवीरांनी उपेक्षित समाजाच्या मुला बाळांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले केले, त्यामध्ये पूर्ण ताकतीने कर्मवीरांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं, असंही शरद पवारांनी अधोरेखित केले.

- Advertisement -

कर्मवीरांच्या विचाराने, शाहू फुल्यांच्या विचाराने काम केलं. त्यांचं जीवन संघर्षमय होतं. संघर्षात त्यांनी अपयश घेतलं नाही. दुर्दैवाने कदाचित वय जास्त झाल्यामुळे जो काही त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यावर त्यांनी दोन तीनवेळा मात केली. पण या शेवटच्या संघर्षामध्ये वाढत्या वयामुळे कदाचित यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यामुळेच आज ते आपल्यामध्ये नाहीत. आम्हा सगळ्यांच्या दृष्टीने कौटुंबिक दु:ख तर आहेच. पण सामान्य माणसाच्या कष्टकऱ्यांच्या दृष्टीने त्यांचं जाणं हा आघात आहे. मला विश्वास आहे महाराष्ट्रातील नवी पिढी त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवेल आणि सामान्यांच्या भल्यासाठी त्यांनी जो रस्ता दाखवला त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करेल, तीच खरी त्यांच्यासाठी श्रद्धांजली ठरेल, असंही शरद पवारांनी सांगितलंय.

राजकारणामध्ये आम्ही दोघे वेगवेगळ्या दिशेने होतो. त्यांच्या विचारधारेशी ते प्रामाणिक होते, आम्ही गांधी नेहरुच्या विचारधारेने पुढे जाणारे लोक होतो. प्रसंगी मतभेद व्हायचे, पण त्या मतभेदाला मर्यादा होत्या. त्यांना एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही हे त्यांनी कटाक्षाने पाळलं. पण रयत शिक्षण संस्था म्हटल्यानंतर त्या संस्थेचा मी अध्यक्ष आणि ते चेअरमन होतो, तेसुद्धा अनेक वर्ष चेअरमन होते, त्या काळात झोकून देऊन काम कसं करायचं हे त्यांच्याकडून पाहिलं, असंही शरद पवारांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

हेही वाचा- शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटलांचे निधन, शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -