शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे काल पहाटे बीडवरून मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर अपघाती निधन झाले. विनायक मेटेंच्या आपघाती निधनावर राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. तसेच त्यांच्या मृत्यूवर शंका देखील व्यक्त केली जात आहे. याचं दरम्यान, शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी देखील त्यांच्या अपघाती मृत्यूबाबत शंका व्यक्त केली आहे.
दीपाली सय्यद सोशल मीडियावरून वारंवार आपलं मत मांडत असतात. दरम्यान, आता त्यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून विनायक मेटेंच्या निधनावर प्रश्न उपस्थित केला आहे.
समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान होत आहे अश्या घातपाताने.@CMOMaharashtra @DGPMaharashtra
— Deepali Sayed (@deepalisayed) August 15, 2022
या ट्वीटमध्ये दीपाली सय्यद यांनी लिहिलंय की, “समाजासाठी लढणारे नेत्यांचे सुवर्णकाळ सुरू होण्याच्या वेळीच कसे अपघात होतात, आणि नेहमी चालकच कसे जखमी होत नाहीत, कदाचित यांचा मास्टर माईंड एकच असु शकतो, शोध अपुर्ण नसावा, शहानिशा झालीच पाहीजे. महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान होत आहे अशा घातपाताने.” अशा शब्दांत दिपाली सय्यद यांनी आपलं मतं मांडलं आहे.
या अपघातामध्ये विनायक मेटेंचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा अंगरक्षक देखील गंभीर स्थितीमध्ये आहे. परंतु गाडी चालकाला काहीही झालेल नाही. त्यामुळे अनेकांनी गाडी चालकावर संशय व्यक्त केला आहे. याचं मुद्द्यावरून दीपाली सय्यद यांनी देखील शंका व्यक्त केली आहे.
या गाडी चालकाचं नाव एकनाथ कदम असून त्याने सांगितल्याप्रमाणे हा अपघात ट्रकने कट मारल्यामुळे झाला. यावेळी आम्हाला लवकर मदत मिळाली नाही. एका तासानंतर घटनास्थळी अॅम्बुलन्स दाखल झाली होती. अशी माहिती गाडी चालकाने त्यावेळी दिली होती.
विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत मेटेंच्या पत्नीलाही संशय
विनायक मेटेंच्या मृत्यूबाबत मेटेंच्या पत्नीलाही संशय असल्याचं त्यांनी स्वताः सांगितलं आहे. त्या म्हणाल्या की, मी स्वत: डॉक्टर आहे. त्यामुळे साहेबांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आले की काहीतरी वाईट घडले आहे. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण साहेबांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता. त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्त येत होते.