सांगलीच्या वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी अमेझॉन इंडियाच्या सहकार्याने जयंत दारिद्रय निर्मुलन अभियानांतर्गत टॅब वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या टॅबचे वाटप जयंत पाटील यांच्या हस्ते दिनांक ७ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजता राजारामबापू पाटील नाट्यगृह, इस्लामपूर येथे करण्यात येणार आहे. कोरोना-१९ या जागतिक महामारीच्या काळामध्ये असामान्य अशी परिस्थिती निर्माण झाली. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूवर या संकटाने प्रभाव टाकला. याचा शैक्षणिक प्रक्रियेवरही परिणाम झाला.
कोरोना विषाणूच्या भीतीने शाळा बंद करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली असेही जयंत पाटील यांनी सांगितले. ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल, टॅब, संगणक आणि इंटरनेट सुविधा या मुलभूत गोष्टींची आवश्यकता असते. मात्र आज अनेक दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना मोबाईल, टॅब, संगणक घेणे आणि इंटरनेट सुविधा घेणे परवडत नाही. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यास आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी ते अभ्यासात मागे पडून त्यांचे शैक्षणिक नुकसानही होत आहे.
म्हणूनच जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनानुसार वाळवा तालुक्यातील दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना हे टॅब वाटप करण्यात येणार आहेत.