परभणी : काहींच्या हातून सत्ता गेल्यामुळे त्यांचा चांगलाच तळपळाट झाला आहे. म्हणून ते सकाळी 9 वाजतापासून भोंगा लावतात तर थेट रात्री दहा वाजेपर्यंत काहींना काही बोलत सुटतात. तेव्हा आमच्यावर टीका जरूर करा, पण विकासावरही बोला असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केले. (Do criticize us, but also talk about development; Devendra Fadnavis appeal to opponents)
महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आज परभणीमध्ये पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात होत असलेल्या या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतूक केले. तर विरोधकांवरही टीकास्त्र सोडले.
परभणीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीका करत राहतात. सकाळी नऊ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री 10 वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. मात्र, आमच्यावर पाहीजे तेवढी टीका करा परंतू विकासावरही काही बोला असे म्हणत त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
हेही वाचा : आगामी लोकसभेसाठी ‘इंडिया’कडून पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरला! ‘या’ राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
खराब रस्ते दिसावे म्हणून दूरचा प्रवास
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर आज सभास्थळापासून दूरवर उतरविण्यात आले. कारण, त्यांना दूरचा प्रवास करून त्यांना परभणीतील खराब रस्ते दाखवायचे होते. तेव्हा आता ते या खराब रस्त्यांचा विकास निधीतून कायापालट करणार असून, सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते तयार करण्यात येतील असेही ते यावेळी म्हणाले.
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपस्थितांनी परभणीबाबत आता काळजी करण्याची गरज नाही. कारण, येत्या काळात परभणीचे चित्र बदलेले दिसेल. यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून मुख्य रस्त्यांना काँक्रिटच्या रस्त्यात बांधलं पाहिजेत असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.