या व्यक्तींना सर्वाधिक धोका
मधुमेही, रक्तदाबाचा त्रास असलेले, अपघात वा अन्य कारणांमुळे शस्त्रक्रिया झालेले, दीर्घकाळापासून औषधोपचार सुरू असलेले, ज्येष्ठ नागरिक, प्रतिकारशक्ती क्षीण झालेले अशा व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्यास अधिक जोखीम निर्माण होऊ शकते. याउलट कमी वय, सुदृढ व्यक्तींमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती ही तुलनेने अधिक असल्याने त्यांच्यात कमी जोखीम असते.
दुष्परिणाम टाळण्यासाठी हे करा
बहुतांश रुग्ण आठवडाभराच्या औषधोपचारानंतर बरे वाटताच पुढील औषधोपचार बंद करतात. त्यांचा हा निर्णय अनेकदा जीवावर बेतू शकतो. तर काही रुग्ण लक्षणे दिसल्यानंतरही भीतीने किंवा अतिआत्मविश्वासामुळे डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात, हा उशीर जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे लक्षणे दिसतात तातडीने चाचणी करुन फॅमिली फिजिशियन किंवा एमडी डॉक्टरांचा सल्ला घ्या. पहिल्या ७ दिवसांनंतर संसर्गावर शरीराकडून नियंत्रण मिळवले जाते, मात्र विषाणूंचे अस्तित्त्व नष्ट झालेले नसते. कोरोना रुग्णांमध्ये रक्ताची गुठळी निर्माण होऊन ब्रेम हॅमरेज, हार्ट अटॅकसारखे प्रकार दिसून आले आहेत. हे टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील १५ दिवस काही औषधे सुरू ठेवावी लागतात. त्यामुळे दुष्परिणाम होत नाही किंवा संसर्ग उलटून येण्याची शक्यता राहत नाही.
म्हणून रेमडेसिवीर, टोसिलिझ्युमॅब प्रभावी
कोरोनाच्या विषाणुंशी लढा देताना शरीराची प्रतिकारशक्ती उच्चतम पातळीवर पोहोचलेली असते, शरीरांतर्गत संसर्ग वाढून श्वसनप्रणालीची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली असते, पुढील टप्प्यात शरीरांतर्गत अवयवांवर सूज यायला सुरूवात होते आणि हीच स्थिती रुग्णाच्या मृत्यूला कारणीभूत ठरते. रुग्ण अशा गंभीर अवस्थेत असताना अवयवांना सूज येण्यास कारणीभूत घटकांना (सायटोकाइन्स) रोखण्यासाठी टोसिलिझ्युमॅब इंजेक्शन परिणामकारक ठरत असते. रुग्णाला पहिल्या टप्प्यात दिलेल्या औषधांनंतरही संसर्ग कमी न झाल्यास रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. त्यानंतरही फुफ्फुसांची क्षमता सुधारली नाही आणि रुग्ण गंभीर अवस्थेत पोहोचला तर अशावेळी रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर टोसिलिझ्युमॅब इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतात.
चव आणि गंध हे विशेष लक्षण
सर्वसाधारणपणे सौम्य आणि मध्यम संसर्ग असलेल्या रग्णांमध्ये पहिल्या तीन दिवसांतच चव आणि गंध जाणे हे लक्षण आढळते. मात्र, गंभीर रुग्णांमध्ये चव-गंध जात नाही, असे दिसून आले आहे. अनेकांना ताप येत नाही, मात्र चव व गंध जाते. अशा रुग्णांना हमखास कोरोना संसर्ग झालेला दिसून येतो.
कोरोनाचे आव्हान कठीण आहे, त्यामुळे त्याकडे आतातरी गांभिर्याने बघायला पाहिजे. सध्याच्या वातावरणात लोकांमध्ये योग्य माहिती जाणे अपेक्षित असताना, संभ्रम निर्माण होईल असे मेसेज व्हायरल होत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची आहे. ज्या कोरोनाबाधितांचा ताप तीन दिवसांनंतरही कमी होत नसेल त्यांनी तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. – डॉ. दिनेश वाघ, एम.डी., अशोका हॉस्पिटल