मुंबई : राज्य सरकारमध्ये अनेकांना परदेश दौरा करायला आवडतो. परदेश दौरे म्हणजे हे सर्व सुट्टी समजायला लागेल आहेत. तुम्हाला कुठे जायचे तिथे जा पण जनतेच्या पैशांवर परदेशवारी नको, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आज (30 सप्टेंबर) महायुती सरकारला सुनावले. परदेश दौऱ्यावर टीका केली म्हणून मुख्यमंत्र्यांनी दौरा रद्द केला, असे सांगतानाच ‘ये डर अच्छा है’ असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच मुंबई महापालिकेच्या रस्ते आणि स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. (Do not spend money abroad Aditya Thackeray told the government)
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून आमदार अपत्रतेच्या संदर्भातील कारवाई प्रलंबित असताना नार्वेकर हे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घाना येथे जाणार होते. मात्र, त्यांनी आपला दौरा रद्द केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ नार्वेकर यांनी आपला परदेश दौरा रद्द केला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि इतर मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा – बाप लेकीतील अतूट नातं : सुप्रिया सुळेंनी खाली बसून शरद पवारांच्या पायात घालून दिली चप्पल
अवकाळी पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा दौरा रद्द केल्याचे कारण दिले जात आहे. पण अवकाळी पावसामुळे दौरा रद्द केलेला नाही, त्यांना शेतकऱ्यांचे काहीही पडलेली नाही, असा हल्लाबोल आदित्य यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला. मुख्यमंत्र्यांचा जर्मनी आणि लंडन दौरा होता. जर्मनीला जाऊन त्यांना हायवे बघायचे होते. त्यांच्याकडे इतकी वर्षे एमएमआरडीएचे खाते आहे. मग आता तिथे जाऊन काय हायवे बघायचे? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.
विधानसभेचे अध्यक्ष घानाला जाणार होते. इथे लोकशाहीची हत्या करताहेत आणि ते तिथे लोकशाहीवर जाऊन बोलणार होते. म्हणजे पेशंट इथे टेबलवर आहे आणि तुम्ही तिथे ऑपरेशन करायला चालले आहात. मूळ मुद्दा हाच आहे की, स्वतःच्या देशात तुम्ही लोकशाही मारत आहात, तिथे जाऊन लोकांसमोर देशाची बदनामी करू नका, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा परदेश दौरा नेमका कशासाठी आहे हे त्यांनी सांगावे. दाओसला जाऊन उद्योगमंत्री करणार काय? चार महिने आधी जाऊन काय पाहणी करणार? असे सवाल करत त्यांनी हा दौरा केला तर मी रत्नागिरी मतदारसंघात जाऊन लोकांना विचारणार हे बरोबर आहे की नाही? असा इशारा ठाकरे यांनी दिला.
हेही वाचा – उगाच पराचा कावळा करण्यात आला; ‘खडाजंगी’ प्रकरणावर भुजबळ स्पष्टच बोलले…
आदित्य ठाकरे यांनी यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरही आक्षेप घेतला. या दौऱ्यासंदर्भात शासन निर्णय दाखवत आदित्य म्हणाले, सरकारच्या जीआरमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, काऊन्सिल जनरल ऑफ जपानने उपमुख्यमंत्र्यांना टोकयोच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आमंत्रित केले होते. याचा अर्थ संपूर्ण खर्च जपान करणार. पण या शासन निर्णयामध्ये लिहले आहे की, त्या दौऱ्याचा संपूर्ण खर्च एमआयडीसीने उचलला आहे. मग या दौऱ्यात उद्योगमंत्री का नव्हते? एक महिना उलटला तरी या दौऱ्यात काय झाले? त्याचा कोणताही अहवाल समोर का आलेला नाही? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले. उपसभापती परदेशात 50 लोकांना घेऊन गेले. त्यांनी काय अभ्यास केला? हे मुद्दे उपस्थित करुन आदित्य यांनी सरकारच्या परदेश दौऱ्यावर संशय व्यक्त केला.
वाघनखे शिवाजी महाराजांची आहेत का?
छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी महाराष्ट्राला तीन वर्षांसाठी उसनवार तत्वावर देण्याचे व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझियमने मान्य केले आहे. म्हणजे हे लोनवर आहे की, परतावा असा प्रश्न उपस्थित करत जर हे परतावा असेल तर महाराजांचे मंदिर व्हावे आणि तेथे वाघनखे ठेवली जावीत. तसेच ही वाघनखे शिवकालीन आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत याचा सरकारने खुलासा करावा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या ट्वीटमुळे मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा रद्द? उदय सामंत यांनी सांगितलं खरं कारण…
फडणवीस यांच्या दौऱ्याचा खर्च जपानचा
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला. कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्या अधिकार्यांचा खर्च केलेला आहे, असा खुलासा भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी केला आहे. जपान दौर्यात देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्यामुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी. बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका! असा उपरोधिक सल्ला शेलार यांनी दिला आहे.