रत्नागिरी – कोकणात रिफायनरी प्रकल्पाला (Refinery Project in Konkan)मान्यता मिळाली आहे. बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार आहे. मात्र, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Leader Raj Thackeray) यांनी कोकणवासियांनाच झापलं आहे. तुमच्या जमिनीचे पट्टे विकले जातात. लपून छपून भुरटे जमिनी विकत घ्यायला येतात, तेव्हा कोकणवासियांनी खबरदारी घेतली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले. तसंच, कोकणासारख्या उत्तम जागी असे प्रकल्प येऊ नयेत असंही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून आज त्यांनी रत्नागिरीत माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी कोकणातील पुढील नियोजनाविषयीही माहिती दिली.
हेही वाचा – मातोश्रीसोबत एकनिष्ठ, म्हणूनच एसीबीची नोटीस; राजन साळवींचा दावा
हे प्रकल्प कोकणासारख्या उत्तम जागी येऊ नयेत. पण, महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रातून प्रकल्प दूर जाणं हेही महाराष्ट्राला परवडणारं नाही. आत्ताच महाराष्ट्रातून दोन ते तीन प्रकल्प बाहेर गेले, अशा परिस्थितीत आपण प्रकल्पांना विरोध करत आहोत. लपून छपून भुरटे जमिनी विकत घ्यायला येतात तेव्हा कोकणवासियांनी खबरदारी घेतली तर असे प्रकल्प येणार नाहीत. एकदम जमिनी विकत घेतले जातात तेव्हा तुम्हाला संशयही येत नाही का? एरवी चर्चा सुरू असतात तेव्हा माझी जमीन गेली, तुझी जमीन गेली या चर्चांमध्ये तुम्हाला संशय येत नाही का? अचानक केंद्र किंवा राज्य सरकार प्रकल्प जाहीर करतं तेव्हा तुम्हाला कळतं की अरे जमिनीचे भाव मिळालेच नाहीत, जमिनीही गेल्या. त्यामुळे अशाबाबतीत आपल्याला जागृक राहता आलं पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.
हेही वाचा – कुणी आडवे आल्यास तुडवा आणि पुढे जा; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश
कोकणात सकारात्मक चिन्ह
कोकणात आल्यापासून लोकांच्या देहबोलीमध्ये खूप प्रकर्षाने काही सकारात्मक चिन्ह दिसत आहेत. हात करताना, नमस्कार करताना जनतेमध्ये सकारात्मकता दिसत आहे. या सर्व गोष्टींचा आढावा घेता मी येत्या जानेवारीत कुडाळला आणि रत्नागिरी किंवा चिपळूणमध्ये सभा घेणार आहे. तसंच, मधल्या काळात विविध कार्यक्रमही घेतले जातील, त्याची माहिती दिली जाईल, असंही राज ठाकरे म्हणाले.