देशाच्या प्रमुख संस्थेमधील २०० वैज्ञानिकांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच आपल्या विरोधास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान करू नका, असे आवाहन केले आहे. आपल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून येत्या निवडणुकीत मतदान करा असा सल्लाही त्यांनी कोणत्याही पक्षाचे नाव न घेता केले आहे.
आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान, विरोधकांना देशद्रोही ठरवणे आणि जात, धर्म, भाषेच्या आधारावर देशातील नागरिकांत फूट पाडणे ही पद्धत केवळ शास्त्रज्ञांसाठीच नसून लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा आहे. तसेच गेल्या ५ वर्षात निवडून आलेल्या राजकीय नेत्यांकडून शास्त्रज्ञांच्या विचारप्रणालीवर हल्ला करण्यात आला आहे. शिक्षण, विज्ञान आणि लोकशाहीबाबात हे लोक टीकात्मक धोरण अवलंबतात. याबाबत ३ एप्रिल रोजी शास्त्रज्ञांकडून हस्ताक्षराद्वारे करण्यात आलेल्या आवाहनातून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या विरोधास देशद्रोही म्हणणाऱ्यांना मतदान करू नका. आपल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करून येत्या निवडणुकीत मतदान करा, असे देशाच्या प्रमुख संस्थेमधील २०० वैज्ञानिकांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर, शास्त्रज्ञांनी हे असामान्य पाऊल उचलण्याचे धाडस दाखवले, कारण भारतच नाही तर जगभरात मागास दिसणारी प्रतिगामी राजकीय विचारधारा आमच्यासाठी चिंतेची बाब बनली आहे. दरम्यान, यापूर्वी काही कलाकार आणि माजी सैनिकांमध्ये या बाबीवरुन मतभेद झाल्याचं पाहायला मिळाले आहे. असे पुण्यातील इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन आणि रिसर्चमधील प्राध्यापक सत्यजीत रथ यांनी म्हटले आहे.