लॉकडाऊनमध्ये मुंबईसह देशात विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना त्याच्या गावी सोडण्यासाठी १ मे पासून श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहे. मात्र, या श्रमिक ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मजुरांचे चांगलेच हाल होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. प्रवासादरम्यान स्थलांतरित श्रमिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही. तसेच प्रवासावेळी रेल्वे डब्यात डॉक्टर आणि सुरक्षा रक्षक राहत नाही. रेल्वे तिकिटांचे भाडे घेतल्या जात आहे. त्यामुळे एखादी जनावरासारखे भरून घेऊन जात असल्याचा अनुभव मुंबईतून गोरखपूरला जाणाऱ्या मजुराला आला आहे.
संपूर्ण देशात कामगारांपैकी तब्बल ८० टक्के कामगार हे अशा रोजंदारीच्या कामावर जगणारे मजूर आहेत. देशाची सगळी बांधणीच या लोकांच्या जोरावर झालेली आहे. कुठलीही इमारत बांधायची असो, रस्ते निर्माण करायचे असो रुग्णालय बांधायचे असो की मॉल्स, सगळ्या कामासाठी हेच मजूर लागतात. देशाच्या अर्थव्यवस्थेत इतकं महत्त्वाचं योगदान देणारा हा घटक आज लॉकडाऊन काळात तितकाच दुर्लक्षित आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईसह देशभरात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी भारतीय रेल्वेकडून श्रमिक ट्रेन चालविण्यात येत आहे. आतापर्यंत मुंबई आणि उपनगरीतून ६० हजार पेक्षा जास्त परप्रांतीय श्रमिक, मजुरांना विशेष श्रमिक ट्रेनचा माध्यमातून त्यांच्या राज्यात सोडण्यात आले आहे. मात्र प्रवास दरम्यान मजुरांना मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.
गोरखपूरचे सूरज शर्मा यांनी दैनिक आपलं महानगराला सांगितले कि, सोमवारी आम्ही २३ लोकांचा ग्रुप तयार करून लोकमान्य टिळक टर्मिलन्सवरून गोरखपूरला जायला निघालो. रेल्वे स्थानकांवर सर्व प्रकारची तपासणी झाली. जेवणाचे पॉकेट आणि एक पाण्याची बॉटेल मिळाली. मात्र, १२ तासाचा प्रवासात एक पाण्याच्या बॉटेलने काय होणार? इतकेच नव्हेतर प्रवास दरम्यान रेल्वे डब्यात सुरक्षा रक्षक नाही डॉक्टर तर नाहीच, जर कंदाची रेल्वे डब्यात एकादी प्रवाशांची प्रकृती बिघडली तर त्याला वैद्यकीय उपचार मिळणार का? जर आमच्याकडून ४०० रुपये श्रमिक ट्रेनचे भाडे आकारत आहे. तर रेल्वेने आणि राज्य सरकारने आम्हाला प्रवास दरम्यान सुविधा द्यायला हवी होती. मात्र, रेल्वे श्रमिक ट्रेन चालवून मजुरांवर उपकार करतेय का? असा प्रश्न सूरज शर्मा यांनी रेल्वेला विचारला आहे. मात्र रेल्वेकडून पूर्ण सुविधा दिल्याचा दावा करण्यात येत आहे.
६० हजार श्रमिक गावाकडे रवाना
भारतीय रेल्वेने मंगळवारपर्यंत चालविण्यात आलेल्या एकुण ५४२ श्रमिक ट्रेनपैकी मध्य रेल्वेवर ८० श्रमिक ट्रेन सोडण्यात आलेल्या आहे. ज्यामध्ये एकट्या मुंबई आणि उपनगरातून ५० श्रमिक ट्रेन सोडण्यात आलेल्या आहे. प्रत्येक श्रमिक ट्रेनमध्ये १२०० प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा होती. मंगळवारपासून त्यामध्ये वाढ करण्यात आली असून सुमारे १७०० प्रवासी एका ट्रेनमधून प्रवास करु शकतात. मुंबई आणि उपनगरातून आतापर्यत तब्बल ६० हजार परप्रांतीय श्रमिक, मजूर रेल्वेच्या माध्यमातून आपल्या गावाकडे पोहोचले आहे.
लॉकडाऊन काळात अडकलेल्या श्रमिकांचा मदतीसाठी विशेष श्रमिक ट्रेन चालवत आहे. रेल्वे स्थानकांवर श्रमिक दाखल होताच थर्मल स्कॅनिगद्वारे तपासणी केली जाते. रेल्वे डब्यात फिजिकल डिस्टन्सचे पालन करून त्यांना बसविण्यात येते. ऑनरूट आरपीएफ आणि आयआरसीटीसीचा माध्यमातून पाणी आणि जेवण सुद्धा पुरविण्याची व्यवस्था केली गेली आहे. – शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे