मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फिरकी घेतली आहे. ‘‘अजित पवार यांना कितीही वेळा उपमुख्यमंत्री होण्यास सांगा, ते कायम तयार असतात. मला त्यांची दया येते,’’ असे त्यांनी म्हटले आहे. कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या नेत्यांची अशी खिल्ली उडवू नये. महाराष्ट्राच्या राज्यपालपदावर बसून त्यांनी राजकारण केले. तो त्यांचा कंडू अद्यापि शमलेला दिसत नाही. अजित पवार यांनी भगतसिंहांना चोख उत्तर द्यायला हवे, पण तेवढे बळ त्यांच्यात आहे काय? असा बोचरा सवाल ठाकरे गटाने केला आहे.
हेही वाचा – …हाच सगळ्यांना प्रेमाचा सल्ला, ठाकरे गटाचा मुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांवर निशाणा
विकासासाठी आपण शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे. अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले? असाही प्रश्न सामना दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे.
अजित पवारांना सत्काराचे वेड
शनिवारी बारामतीत अजित पवार यांचे जंगी स्वागत झाले. बारामतीच्या होमग्राऊंडवर अशा स्वागताचा थाटमाट करून घ्यावा असे अजित पवार यांना का वाटावे? आतापर्यंत किमान चारवेळा अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले व शरद पवार यांच्या कृपेने त्यांना ही सर्व सत्तेची पदे मिळत गेली. त्यावेळी अजितदादांनी होमग्राऊंडवर स्वतःचे अशा पद्धतीने स्वागत करून घेतल्याचे दिसले नाही. उलट त्यांनी कार्यकर्त्यांना जरबेत सांगितले की, ‘‘सत्कार, हारतुरे वगैरे नकोत. कामाला लागायचे आहे.’’ पण भाजपाच्या पलंगावर गेल्यापासून अजित पवारांना सत्काराचे वेड जडले आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – INDIA vs NDA : भाजपाला मोठा धक्का? चार ते पाच पक्ष ‘INDIA’च्या संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा
शाळांतून द्वेषाचे धडे
बारामतीत जाऊन अजितदादा असेही म्हणाले की, ‘‘मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत’’. मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपाचा एककलमी कार्यक्रम आहे. लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर झुंजवायचे हा काही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार नव्हता. शाळांतून द्वेषाचे धडे कसे दिले जात आहेत, ते उत्तर प्रदेशातील एका प्रकरणावरून उघड दिसते. शिक्षिकेच्या सांगण्यावरून मुस्लीम विद्यार्थ्यास शाळेतल्या त्याच्या वर्गमित्रांनी बेदम मारहाण केली. असे विष आज समाजात सर्वत्र पसरवले जात आहे व हे शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार नक्कीच नाहीत, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – आगामी मुंबई महापालिका निवडणुकांबाबत सत्ताधाऱ्यांची रणनीती ठरली; विरोधकांचा अशाप्रकारे करणार पराभव
‘हे’ विचार भाजपाच्या अजेंड्यावर नाहीत
आज सर्वच पातळ्यांवर संविधानाची मोडतोड करून एक प्रकारे हुकूमशाही पद्धतीने कारभार चालला आहे. त्यामुळे भाजपासोबत गेलेले अजित पवार हे डॉ. आंबेडकरांचा कोणता विचार पुढे नेऊ इच्छितात, हे त्यांनी महाराष्ट्राला खुलेपणाने सांगायला हवे, असे आवाहन करून, भाजपा जे लिहून देईल त्याच अजेंड्यावर अजित पवार यांना काम करायचे आहे व शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार त्या अजेंड्यावर नाहीत. पुन्हा कोश्यारी यांना अजित पवार यांची दया येते, पण फौजदाराचे हवालदार झालेल्या देवेंद्र फडणवीस यांची दया येत नाही, अशी कोपरखळी ठाकरे गटाने लगावली आहे.