(Dr. Manmohan Singh) मुंबई : ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92व्या वर्षी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत डॉ. मनमोहन सिंग यांना भावांजली अर्पण केली आहे. (Raj Thackeray’s tribute to Manmohan Singh)
राज ठाकरे म्हणतात, 1991ला जेव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचे काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात, नरसिंहराव यांच्यासारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील, खरं.
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली… pic.twitter.com/hZCkKw8jqv
— Raj Thackeray (@RajThackeray) December 27, 2024
जुलै 1991 साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंग यांनी एक वाक्य वापरलं होतं, “no power on earth can stop an idea whose time has come”. थोडक्यात भारताचा काळ सुरू होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिंग, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी त्यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त केली आहे.
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : भावी पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्रोत, शरद पवारांकडून शोकसंवेदना
पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले आणि ते देखील सलग दहा वर्षं. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतूंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, “I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament….”, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावे, घडवावे यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंग यांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवले ते अनेकांना बोलूनही करून दाखवता आलेले नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले आहे. (Dr. Manmohan Singh : Raj Thackeray’s tribute to Manmohan Singh)
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : भारतीय संघाने सामना खेळताना व्यक्त केला शोक, हाताला बांधली काळी पट्टी