नाशिक – दिमाखदार संमेलनाची जय्यत तयारी, भारावलेली कुसुमाग्रज नगरी आणि अध्यक्षांची रिकामी खुर्ची… असा विरोधाभास उपस्थितांसह प्रमुख पाहुण्यांनाही खटकला. अखेर आयोजकांनी संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकरांच्या रेखाचित्राला रिकाम्या खुर्चीवर विराजमान करत आयोजकांनी सोहळा निभावून नेला.
नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत सुरू झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि विशेषतः ग्रंथदिंडी विशेष लक्षवेधी ठरली. त्यामुळे उद्घाटन सोहळ्याकडेदेखील सर्वांचं लक्ष लागून होतं. मात्र, अपेक्षेप्रमाणे संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर स्वतःच अनुपस्थित असल्यानं त्यांची खुर्ची रिकामीच होती. त्यामुळे आयोजकांनी डॉ. नारळीकरांचं रेखाचित्र ठेवत सोहळा साजरा केला. डॉ. नारळीकरांच्या उपस्थितीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता होती. त्यांना आणण्यासाठी थेट हेलिकॉप्टरची व्यवस्थादेखील करण्यात आली होती. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते उपस्थित राहणार नसल्याचं सांगण्यात आलं.