राज्यात सध्या कोरोनाचे संकट असून, कोरोनाचा लढा राज्य सरकार लढत आहे. त्यातच आता दुष्काळाच्या झळा देखील राज्यातील काही भागात बसू लागल्या आहेत. याचमुळे आता राज्यातील विविध भागात पाण्याच्या टँकरचे प्रमाण वाढले आहे. राज्यात सध्या १८६ गावडे आणि ३६० वस्त्यांमध्ये १७० टँकर पुरवावे लागत आहेत. दरम्यान १३ एप्रिलपर्यंत राज्यात हीच आकडेवारी १३२ गाव आणि २९८ वस्त्यांमध्ये १४५ टँकरचा वापर होत होता. दरम्यान राज्याच्या पाणी पुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे.
या भागात होतो टँकर पुरवठा
दरम्यान राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. मराठवाड्यातील ६५ गावामध्ये आणि १६ वस्त्यांमध्ये सगळ्यात जास्त ७८ टँकर पुरवावे लागत आहेत. औरंगाबादमधील ४६ गावामध्ये आणि १० वस्त्यांमध्ये ३९ टँकर, बीड़च्या १२ गावामध्ये आणि ६ वस्त्यांमध्ये ३१ टँकर,
उस्मानाबादमधील ७ गावामध्ये ८ टँकर, अमरावती ४ गावांमध्ये ४ टँकर पुरवले जात आहेत. तर अमरावती जिल्ह्यातील एका गावात एक टँकर, आणि यवतमाळच्या ३ गावामध्ये ३ टँकर पुरवले जात आहेत. उत्तर महाराष्ट्रमध्ये फक्त अहमदनगरमधील ११ गावामध्ये १३ टँकरचा वापर केला जात आहे. तर पुणे विभागातील सांगलीच्या चार गावामध्ये आणि २६ वस्त्यांमध्ये ४ टँकरचा वापर होत आहे. तर ठाणे विभागातील १०० गावामध्ये आणि २२७ वस्त्यांमध्ये ६८ टँकर पूरवले जात आहेत. रायगड जिल्ह्यातील २९ गावामध्ये आणि ९७ वस्त्यांमध्ये १४ टँकर, रत्नागिरीमधील १८ गावे आणि ३० वस्त्यामध्ये ७ टँकर, तर पालघरमधील २० गावामध्ये आणि ५५ वस्त्यामध्ये २२ टँकरने पाणी पूरवठा केला जात आहे.
राज्यातील टँकरची स्थिती पूढील प्रमाणे
तारीख गाव-वस्ती संख्या टँकर संख्या
२ मार्च ९ १९
९ मार्च २१ २५
१६ मार्च ३९ २९
२६ मार्च ६१ ३७
३० मार्च ११५ ५८
६ एप्रिल १९० ८७
१३ एप्रिल ४३० १४५
२० एप्रिल ५४६ १७०