ठाणे शहरात नव्या तंत्रज्ञानाने तयार केलेले गुळगुळीत रस्त्यांवरून गेल्या काही दिवसात दुचाकीस्वार घसरण्याचे प्रकार वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. आतापर्यंत या घटनांमध्ये कोणालाही रक्त येईल अशी दुखापत झाली नव्हती. पण, सोमवारी रात्री नौपाड्यातील उड्डाणपुलावरील अशाच घटनेत ३० वर्षीय दुचाकीस्वार रोशन म्हात्रे हे किरकोळ जखमी झाले आहेत. (due to Smooth roads increase bike accident in thane)
या वाढत्या घटनांमुळे हे गुळगुळीत रस्ते धोक्याची घंटी वाजू लागले आहेत. याबाबत महापालिका प्रशासनाने वेळीच लक्ष घालून अपघाताबरोबर त्यातून होणारी भविष्यातील जीवितहानी त्यापूर्वीच रोखावी,अशी मागणी पुढे येत आहे. तसेच गुळगुळीत रस्त्यांवरून घसरणाऱ्यांकडून सोशल मिडियावर जनजागृती करत, मित्रमंडळीसह सर्वांनाच ‘सावकाश वाहन चालवा, असे आवाहन केले जात आहे.
पावसाळ्यापूर्वी महापालिकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील नौपाडा, मखमली आणि मीनाताई ठाकरे चौकातील उड्डाणपुलावर खड्डेमुक्त होण्यासाठी ते गुळगुळीत केले. हे रस्ते पाहून कळवा पुलावरील रस्त्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावी अशी मागणी केल्याचे महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. पण, पावसाळा सुरू होत नाही तोच हे गुळगुळीत रस्ते आता डोकेदुखी ठरताना दिसत आहे. जून महिन्यात नौपाडा उड्डाणपुलावर दुचाकी घसरल्याच्या काही घटना पहिल्यांदाच पुढे आल्या.
याबाबत नौपाडा पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षेत तक्रार केली होती. मात्र नेमक्या किती दुचाकी घसरल्या याची कोणतीही नोंद ना पोलिसांकडे ना आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडे आहे. त्यानंतर सिलसिला सुरू झाला आणि मखमली उड्डाणपुलावर दुचाकी घसरून लागल्याची तक्रार वाहतुक पोलिसांनीच आपत्ती व्यवस्थापन कक्षेत केली.
या वाढत्या घटना लक्षात घेऊन महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट घेऊन हे प्रकार रोखण्यासाठी त्या उड्डाण पुलावरील रस्त्यावरती जेसीबीच्या सहाय्याने खाचा मारण्यात आल्या. त्यामुळे हे प्रकार कमी होतील असे वाटले होते. पण, काही दिवसांनी मखमली उड्डाणपुलावर दुचाकी घसरल्याचा पूर्वीचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याचीही तक्रार आपत्ती कक्षेकडे एका माजी नगरसेवकाने केली आहे. हे होत नाहीतोच नौपाड्यातील उड्डाणपुलावर घसरलेल्या दुचाकीवरून चालक जखमी झाल्याने पुन्हा हे रस्ते चर्चेला आले आहे. यावेळी आणखी दोघे घसरले होते.
या घटनांमध्ये कोणी घरातील कर्ता व्यक्ती जायची महापालिका प्रशासन वाट पाहत आहे का असा सवाल या उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आता तरी या गुळगुळीत रस्त्यांवरील हे प्रकार वेळी रोखावे, अशी मागणी दुचाकीस्वारांसह त्यांच्या कुटुंबियांकडून होऊ लागली आहे.
“हे रस्ते खरोखरच खूप चांगले आहेत. या रस्त्यांवर अजून तरी एकही खड्डा पडलेला नाही. पण, या गुळगुळीत रस्त्याने जर दुचाकी किंवा इतर वाहने घसरत असतील हे रस्ते तसे घातकच आहे. हे सांगायला नको. या रस्त्यांवर जसे खड्डे पडणार नाहीत, त्याचप्रमाणे वाहने घसरून कोणी जखमी किंवा कोणाचा जीव जाणार नाही याची दक्षता वेळीच महापालिका प्रशासनाने घ्यावी.”
– राजेश चव्हाण, दुचाकीस्वार
जे गुळगुळीत रस्ते तयार केलेले आहेत. ते फक्त काही मोजक्यात ठिकाणी तयार केलेले आहेत का ? हे गुळगुळीत रस्ते शहरभर तयार करावे, तदपूर्वी ते महापालिका भवनाजवळ करून अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी त्याचा अनुभव घ्यावा. तसेच ज्यांनी हे नवे तंत्रज्ञान आणले त्यांनी त्या रस्त्यावर ४० च्या स्पीडने वाहन चालवत ब्रेक दाबावा मग समजेल. हे रस्ते वाहन चालकासाठी किती धोकादायक आहे. असे रस्ते बनवून पैश्यांची उधळपट्टी करू नये. तसेच आपण घसरण्यापूर्वी आपले नातेवाईक घसरले होते.
– रोशन म्हात्रे, जखमी दुचाकीस्वार
सोशल मीडियावर केले जातेय आवाहन
दिवसेंदिवस गुळगुळीत रस्त्यावरून घसरणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने त्या दुचाकीस्वारांनी आपआपल्या दुचाकी चालविणाऱ्या मित्रमंडळींना या रस्त्याने जाताना घडलेला प्रकार सांगून सावकाश जा असे आवाहन केले जात आहे.
हेही वाचा – रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घ्या, मुख्यमंत्र्यांच्या ‘एमएमआर’ला सूचना