उल्हासनगरातील विविध भागात रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यावरुन उठणार्या धुळी मुळे नागरिकांना श्वास घेणे मुश्किल झाले आहे. खास करून या धुळी मुळे दमा,खोकला,सर्दी आणि श्वासनांच्या विकाराने नागरिक कमाली चे त्रस्त झाले आहेत. उल्हासनगर च्या पाच ही कॅम्पमध्ये रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. या रस्त्यावर धावणार्या वाहनांमुळे सम्पूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. हिराघाट ते पवई श्रीराम चौकापर्यंत रस्ता खराब असल्याने सतत उठणार्या धुळीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
चार नंबर स्मशानभूमी पासून पाच दुकान, गुरुनानक हायस्कुल आणि दहाचाळ परिसरातील रस्ते खराब झाले आहेत. या ठिकाणी धुळीचा त्रास जास्त आहे. त्यामुळे या परिसरातील इमारतीत राहणार्या रहिवाशांना दारे खिडक्या चोविस तास बंद ठेवाव्या लागत आहेत. येथील त्रिरत्न मेडिकल स्टोर्स चे मालक नरेंद्र वारुळे यांनी सांगितले की आमच्या दुकानात इतकी धूळ साचते की ग्राहकांना औषध देताना सतत सफाई करावी लागते. कुर्ला कॅम्प ते नेताजी रोड वरील फिनिक्स आणि बालाजी हे दोन नामांकित हास्पिटल आहेत. या रस्त्यावरून उठणार्या धुळीमुळे या हॉस्पिटलचे रुग्ण आणि डॉक्टर तसेच या मार्गावरील सर्व इमारतीत राहणार्या नागरिकांना या धुळीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या भागातील माजी नगरसेवक राजेश वानखेडे, प्रमोद टाळे, माजी नगरसेविका अंजली साळवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेक वेळा तक्रार करूनही शहर अभियंता केवळ आश्वासन देऊन त्यांची बोळवण करीत आहे. कॅम्प नंबर एक येथील कमला नेहरू नगर ते बाल्कणजी बारी, सेंट्रल हॉस्पिटल ते फालवर चौक पवई चौक ते विठ्ठलवाडी स्टेशन तसेच करोतिया नगर ते सी ब्लॉक या शिवाय कॅम्प नंबर पाचच्या बहुतांश भागात धुळीने धुमाकूळ घातल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दुसरीकडे महानगरपालिकेने धुळीच्या प्रदूष्णाला नियंत्रित करण्यासाठी आणलेल्या दोन मिस्ट मशिन्स शहरात फक्त पाण्याच्या फवारा मारत फिरत आहेत. परंतु हा प्रयोग देखील अयशस्वी ठरला आहे. या बाबत आयुक्त अजीज शेख यांनी सांगितले की शहरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात येत असून तसेच रस्त्यांची दुरुस्ती कामाला सुरवात करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात रस्त्यांची समस्या दूर होईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.