महाराष्ट्रातील पालघर आणि नाशिक जिल्ह्यात आज (बुधवार) पहाटे तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नाशिक पश्चिम आणि पालघरमध्ये जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. अगदी पहाटे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने सांगितले की, नाशिकच्या पश्चिमेला 89 किमी अंतरावर आज पहाटे 4.4 च्या सुमारास 3.6 रिश्टर स्केलचा भूंकप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती.
An earthquake of magnitude 3.6 occurred 89km West of Nashik, Maharashtra at around 04:04am today. The depth of the earthquake was 5 km below the ground: National Center for Seismology pic.twitter.com/ULIdOrtiRN
— ANI (@ANI) November 22, 2022
तर पालघरच्या डहाणू, तलासरी, कासा, आंबोली, धानिवरी, उर्से, धुंदलवाडी, घोलवड, बोर्डी तालुक्यातही पहाटेच्या सुमारास 3.6 रिश्टर भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नाशिक आणि पालघरमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पालघर भागांत सातत्याने सन 2018 पासून सातत्याने भूकंपाचे मध्यम आणि सौम्य धक्के बसण्याच्या घटना घडत आहेत. यात 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेपेक्षा अधिक तीव्रता असणाऱ्या धक्क्यांची संख्या मोजली गेली आहे. गेल्या वर्षभरापासून भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली होती.मात्र आज पहाटे जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नाशिकसह डहाणू, तलासरी तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजवर झालेल्या या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे मोठी जीवितहानी झाली नसली तरी या परिसरातील घरांना अनेक तडे गेले आहेत. त्यामुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.