शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीने पुन्हा एकदा भावना गवळींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहावे असे आदेश भावना गवळींना देण्यात आले आहे. जर यावेळी चौकशीस हजर राहण्याचे टाळले तर त्यांच्याविरोधात ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी भावना गवळींना ईडीने समन्स पाठवले आहे. यापूर्वीसु्द्धा ईडीने भावना गवळी यांच्यावर कारवाई केली आहे.
शिवसेना खासदार भावना गवळी ईडीच्या रडारवर आहे. भावना गवळी यांचा निकटवर्तीय सईद खान याला ईडीने अटक केल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेकवेळा त्यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठवले आहे. तसेच त्यांनी अनेकवेळा चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे जर आता चौकशीला हजर राहिल्या नाही तर ईडी अजामिनपात्र वॉरंट काढण्याची शक्यता आहे. ईडीने भावना गवळींच्या संबंधित असणाऱ्या ९ ठिकाणांवरसुद्धा छापेमारी केली होती.
भावना गवळींवर नेमके आरोप काय?
भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनकडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाने ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.
याशिवाय, भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून ७.५ कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.
हेही वाचा : राज्यात राजकीय सभांचा धडाका, महाराष्ट्रदिनी मनसे आणि भाजपची सभा; तर १४ मे रोजी होणार सेनेची सभा