गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मदिनानिमित्त आज बीड येथे गोपीनाथ गडावर पकंजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा होत आहे. या मेळाव्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रकाश मेहता देखील उपस्थित आहेत. मेळावा सुरु होण्याआधीच नाराज एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खडसे म्हणाले की, पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांच्या पराभवामागे पक्षातीलच काही लोकांचा हात आहे. माझे तिकीट नाकारून मुलगी रोहिणी खडसे इच्छुक नसतानाही पक्षाने तिला तिकीट दिले. गोपीनाथ मुंडे यांच्यसारखे नेतृत्व आता पक्षात राहिले नाही, आताच्या नेतृत्वात द्वेशाची, मत्सराची भावना आहे. ज्यांना आम्ही तयार केले, त्यांनीच विश्वासघात केला, असा आरोप करत खडसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधले.
शेटजी-भटजींच्या पक्षाला मुंडेंनी बहुजन चेहरा दिला
एकनाथ खडसे म्हणाले की, “भाजप जनसंघापासून शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगे अशा नेत्यांनी पक्षाला बहुजनांमध्ये नेले. या नेत्यांनी संघर्ष केल्यामुळेच भाजपला आज अच्छे दिन आहे. मात्र या चांगल्या दिवसांमध्ये गोपीनाथ मुंडे आज आपल्यासोबत नाहीत, याची खंत वाटते. तसेच काळ झपाट्याने बदलत असतो हे आपण सर्वांनी एका महिन्यात पाहिलं आहे.”