घरताज्या घडामोडीपक्षांतर करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही; खडसेंचं अजूनही तळ्यात-मळ्यात?

पक्षांतर करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही; खडसेंचं अजूनही तळ्यात-मळ्यात?

Subscribe

एकनाथ खडसे नाराज असल्याचं त्यांच्या अनेक प्रतिक्रियांमधून दिसून आलं होतं. मात्र, आपण नाराज नसून पक्षांतर करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, अशी प्रतिक्रिया देऊन खडसेंनी त्यांच्या नाराजी आणि पक्षांतरावर अजूनच संभ्रम निर्माण केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नाराजीच्या चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू होत्या. स्वत: खडसेंनी देखील अनेकदा ‘राज्यातल्या पराभवाला राज्यातलं नेतृत्व जबाबदार आहे, सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढली असती, तर २५ जागा जास्त निवडून आल्या असत्या’, अशी जाहीर टीका देखील एकनाथ खडसेंनी केली होती. मात्र, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ‘मी नाराज आहे ही बातमीच चुकीची आहे’, असं म्हणत खडसेंनी या चर्चांना नवी फोडणीच दिली आहे. ‘मी नाराज आहे हीच बातमी चुकीची आहे. त्यामुळे माझ्या मनधरणीसाठी सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आले यातही तथ्य नाही. त्यांच्याशी स्वाभाविकपणे राजकीय चर्चा होते. आपलं सरकार का आलं नाही? यावर आमची चर्चा झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेत्यांशी आमची जवळीक आहे. त्यामुळे मी त्यांच्या पक्षात असायला हवा, असं त्यांना वाटण्यात गैर काही नाही. पण याबाबत मी अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही’, अशी सूचत प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दिली आहे.


हेही वाचा – नागपूरचं अधिवेशन हे फक्त औपचारिकताच आहे-फडणवीस

‘शरद पवारांशी बोललो, त्याच मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांशी बोललो’

मंगळवारी सकाळी पंकजा मुंडेंची भेट घेतल्यानंतर संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची एकनाथ खडसेंनी भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या पक्षांतराविषयी चर्चा होईल असं म्हटलं जात होतं. मात्र, ‘भेटीमध्ये आमच्या मतदारसंघातल्या जलसिंचन प्रकल्पाविषयी चर्चा झाली. त्या प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांना मदत उपलब्ध करून देण्यासंदर्भात विनंती केली’, असं एकनाथ खडसे यावेळी म्हणाले. ‘शरद पवारांशी देखील याच मुद्द्यावर मी बोललो’, असं देखील ते म्हणाले.

- Advertisement -

‘गोपीनाथ गडावर जाणार’

दरम्यान, यावेळी एकनाथ खडसेंनी येत्या १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडेंनी आयोजित केलेल्या गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं स्पष्ट केलं. ‘मुंडे साहेब असल्यापासून आम्ही तिथे जात आहोत. आत्ताही आम्ही जाणार आहोत. मी मंत्री असताना गोपीनाथ मुंडेंचं स्मारक उभारण्यासाठी औरंगाबादमध्ये जागा उपलब्ध करून दिली होती. पण ते स्मारक अद्याप बनू शकलेलं नाही. त्यासाठी उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. त्यांनी ती मान्य देखील केली आहे’, असं खडसे यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -