मुंबईः उमरी व पोहरादेवी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामाचा आढावा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आढावा घेतला. तीर्थक्षेत्राच्या कामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही. काम मार्च २०२४ पर्यंत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे शिखर समितीच्या बैठकीत सांगितले.
हेही वाचाःवीणकर समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावलं उचलणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. अन्न व औषध प्रशासन मंत्री व वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार राजेंद्र पाटणी, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी यावेळी उपस्थित होते.
या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विकास कामांसाठी दानपत्राद्वारे मिळणारी जमीन संपादनाची प्रक्रिया तातडीने राबवावी, असे यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. सध्या प्रकल्पाचे काम सुरू असून मुख्य इमारतीचे काम पूण होत आले आहे. प्रकल्प दोन अंतर्गत समाधी परिसर बांधकाम, भाविकांसाठी सोयीसुविधा याबाबत वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. बैठकीस वित्त (व्यय) विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी यावेळी उपस्थित होते.
आषाढी वारीतील समन्वयासाठी दोन मंत्र्यांवर जबाबदारी
पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करणे तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांवर समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी टाकली आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन मंत्री समन्वयक मंत्री म्हणून काम पाहतील.
पंढरपुरात राजकीय नेत्यांचे नव्हे, वारकऱ्यांच्या स्वागताचे फलक लावा
पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. काल मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला तसेच वारकऱ्यांची संवादही साधला यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. पंढरपूरला राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येतात. विठ्ठल रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, अशावेळी राजकीय पक्षांचे बॅनर्स लावण्यापेक्षा मजल दरमजल विठूनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावले पाहिजेत असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुचवले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना केल्या.
चेंबूरमध्ये मागास विद्यार्थिंनीसाठी ‘माता रमाई’ वसतीगृह
सामाजिक न्याय विभागाने खास मागसवर्गीय विद्यार्थिंनीसाठी उभारलेल्या शासकीय वसतीगृहाचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वसतीगृहाला ‘माता रमाई’ नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. २५० विद्यार्थींनीची क्षमता असलेले हे शासकीय वसतीगृह आहे. वसतीगृहाच्या या नवीन इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या इमारतीची पाहणीही केली. चेंबूरमधील रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील, असे आश्वासन देते मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बार्टी, सारखी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून सर्व घटकातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणातून सामाजिक उन्नती साधण्यावर भर दिला होता. सरकारचे त्याच दिशेने मार्गक्रमण सुरु आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न सरकारमार्फत होत आहे. राज्य शासन अनुसुचित जाती, जमाती व बहूजन वर्गाच्या कल्याणासाठी विविध योजना राबवित आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविली आहे. सामाजिक न्याय, उच्च व तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, इतर मागास विभाग, शालेय शिक्षण विभाग, कौशल्य विकास आदी विभागांमार्फत विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जात आहेत.