राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेच्या अनेक आमदारांना हाताशी घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काहीही दगाफटका होण्याची शक्यता आहे. हीच संभाव्य स्थिती टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला. शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून त्यांना काढण्यात आले असून हे पद शिवडीचे आमदार अजय चौधरी यांना देण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनीही पहाटेच्या शपथ विधिनंतर अशीच खेळी केली होती.
शिवसेना विधिमंडळ गटनेते पदावरून काढून टाकल्याने शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याने खूप मोठा धोका टळला असल्याचे अनेक राजकीय तज्ञ सांगतात.
२०१९ ला विधान सभेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राज्यात राजकीय धुळवड सुरू होती. कोण सत्ता स्थापन करणार याकडे साऱ्यांचे लक्ष होते. त्यातच शिवसेना आणि भाजपचा काडीमोड झाल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र ऐन वेळेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकून सत्ता स्थापन केली. त्यावेळी अजित पवार विधी मंडळाचे गटनेते होते, मात्र त्यांची विधी मंडळात तशी नोंद करण्यात आली नव्हती. त्यामुळे शरद पवार यांनी अजित पवार यांना तत्काळ गटनेते पदावरून काढले. त्याजागी जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आणि तशी नोंदणी विधी मंडळ कार्यालयात जाऊन करण्यात आली.
गटनेते पदामुळे काय होऊ शकेल?
एकनाथ शिंदे गटनेते पदी कायम राहिले असते तर ते आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना देऊ शकले असते.