विधानसभेत आज शिंदे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला असून राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार आले आहे. यावेळी गेल्या अनेक दिवसांपासून मोजकंच बोलणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली.
शिंदे यावेळी त्यांच्या खासगी आयुष्यापासून शिवसेनेतील बंडापर्यंतच्या प्रवासावर दिलखुलासपणे बोलले. गुजरातला जाताना एकही आमदार आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटून जाऊया असे म्हटले नाही. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. विश्वास आहे. एका दिवसाचा कार्यक्रम नाहीये. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू होता. हे सुनिल प्रभुंना माहित आहे. पण मी शिवसैनिक आहे. ठरवलं जे होईल ते होईल. शहीद झालो तरी चालेल. पण आता माघार नाही. शिवसेना वाचवण्यासाठी शहीद झालो तरी चालेल असेही शिंदे यावेळी म्हणाले.
तसेच यावेळी ज्या बंडखोरीमुळे शिंदेवर आणि त्यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांवर टिकेची झोड उठली त्यावरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की माझ्या आमदारांना सांगितलय की चिंता करु नका. ज्या दिवशी मला वाटेल की तुमचं नुकसान होतयं. त्या दिवशी मी तुम्हाला सांगेन. तुमच भवितव्य सुरक्षित करुन मी या जगाचा निरोप घेईन. ही छोटी घटना नाहीये. एक ग्रामपंचायतचा सदस्य नगरसेवकही इकडे तिकडे जाण्याची हिंमत करतनाही. मग हे का झालं का केलं त्याच्या मुळाशी जाऊन कारण शोधायला हवं. असंही शिंदे यावेळी म्हणाले. शिंदे यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्यावर होता. तसेच यावेळी त्यांनी बंडखोरीनंतर करण्यात आलेल्या त्यांच्या बदनामीवरही भाष्य केलं. एकीकडे चर्चेसाठी माणसं पाठवायची दुसरीकडे गटनेतेपदावरून काढून टाकायचं. पुतळे जाळायचे. घरावर दगडफेक करायचे आदेश दयायचे. पण एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारण्याची हिंमत करणारा अजून पैदा झालेला नाहीये असा इशाराच मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला.