गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला असून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. धार्मिक, कनवाळू, ऊन, वारा पावसाला न जुमानता गरजूंच्या मदतीला धावून जाणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे महाराष्ट्राला परिचित आहेत. पण याव्यतिरिक्त शिंदे यांची अजून एक वेगळी ओळख आता अधोरेखित झाली आहे. ती आहे साताऱ्याची. कारण शिंदे हे मूळचे साताऱ्याचे असून त्यांच्या रुपाने राज्याला चौथा सातारकर मुख्यमंत्री लाभला आहे.
श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022
याआधी मुख्यमंत्रीपद भूषविलेले यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण हे देखील साताऱ्याचे होते . याबद्दल राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी टि्वट मधून आनंद व्यक्त केला असून शिंदे यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातल्या आहिर येथे झाला आहे. तर त्यांचे मूळ गाव हे दरे तालुका जावळी आहे. शिंदे शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी ठाण्यात आले आणि कायमचे ठाणेकर झालेत. याचपार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शिंदे यांच्याकडून महाराष्ट्राच्या हिताची जपणूक केली जाईल असे टि्वटमध्ये म्हटले आहे.