घरमहाराष्ट्रशिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा अमरावतीत पराभव; संजय गायकवाडांचं मोठं विधान

शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा अमरावतीत पराभव; संजय गायकवाडांचं मोठं विधान

Subscribe

राज्यातील नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोकण आणि अमरावती या पाच राज्यांतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालातून मविआने सर्वाधिक जागांवर विजय मिळवत शिंदे फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. या निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. तर अपक्षाला एक आणि मविआने तीन जागांवर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. परंतु शिवसेनेतील बंडखोरीमुळे ही निवडणुकही सत्ताधारी आणि विरोधकांसाठी प्रतिष्ठेची झाली होती. यात अमरावतीमधील निवडणूक जिंकण्यासाठी तर खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. परंतु अमरावतीमध्ये मविआच्या धीरज लिंगाडे यांच्या दणदणीत विजयामुळे फडणवीसांची खेळी सपशेल अपयशी ठरल्याची दिसतेय. अशात शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी या पराभवासाठी भाजपला जबाबदार धरलं आहे. शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यानेच भाजपचा अमरावतीत पराभव झाला, असं मोठं विधान संजय गायकवाड यांनी केलं आहे.

शिंदे गटातील नाराज आमदार म्हणून संजय गायकवाड गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. मंत्रीपद आणि मान पान न मिळाल्याने संजय गायकवाडांनी आपल्या नाराजी अनेकदा बोलून दाखवली. मात्र आता पुन्हा विधान परिषदेच्या पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर त्यांनी हीच धुसफूस व्यक्त केली आहे. या पराभवानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपावर गंभीर आरोप केलं आहेत. या निवडणुकीत आमच्या पक्षाचे दोन आमदार असून देखील आम्हाला आणि आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं गेलं नाही, असा गंभीर आरोप संजय गायकवाडांनी केला.

- Advertisement -

तसेच शिंदे गटाला विश्वासात न घेतल्यामुळेचं भाजपच्या रणजित पाटील यांचा पराभव झाला, असं मोठा दावा गायकवाड यांनी केला. तसेच ते पुढे म्हणाले की, बुलढाणा जिल्ह्यात शिंदे गटाचे दोन आमदार, एक खासदार आहेत. आम्हाला कोणाला ही विश्वासात घेतलं गेलं नाही. आमच्याकडे एवढी मोठी कार्यकर्त्यांची फळी आहे. पण त्यांनासुद्धा विश्वासात घेतलं गेलं नाही. निवडणुक मतदार यादी मागितली तरी देखील आम्हाला देण्यात आली नाही, असा आरोपही संजय गायकवाडांनी केला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील बंडखोरी करत नवा गट तयार केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या सत्तांतरामुळे मविआ सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. मात्र या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे तर मुख्यमंत्री झाले पण त्यांच्यासोबत बंडखोरी करुन आलेले आमदार मात्र मंत्री पद तसेच सरकारमध्ये मानपान मिळत नसल्याने नाराज आहेत. सातत्याने ते आपली नाराजी कोणत्या ना कोणत्या वेळी जाहीर करून दाखवतात. अशाचप्रकारे आमदार संजय गायकवाडांनी या निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे फडणवीस सरकारवरील नाराज उघड केली आहे.


बरेच धक्के भाजप- मिंधे गटास पचवायचेत, ही तर सुरुवात; ठाकरे गटाचं टीकास्त्र

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -