घरमहाराष्ट्रअखेर कलेक्टरने पार्कवर फिरवला बुलडोझर

अखेर कलेक्टरने पार्कवर फिरवला बुलडोझर

Subscribe

खासदार गोपाळ शेट्टींना झटका

बोरिवली एक्सर व्हिलेज येथे लिंकरोडवर असलेल्या दोन तलावांपैकी एक तलाव खासदार गोपाळ शेट्टी यांनी आमदार असताना बुजवला होता. तर दुसरा एक तलाव छोटा केला होता. तलाव बुजवून जॉगर्स पार्क व लहान मुलांचे मैदान बनवण्यात आले होते. याबाबत उच्च न्यायालयाने तलाव होते तसे करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्या आदेशाकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अवमान याचिका दाखल केल्यावर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने अनधिकृत बांधकाम हटवून तलाव होते तसे करण्यास सुरुवात केली आहे. हा खासदार गोपाळ शेट्टी यांना मोठा झटका असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत यांनी म्हटले आहे.

उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

पश्चिम उपनगरातील बोरीवली एक्सर व्हिलेज येथे बोरिवली दहिसर लिंक रोडवर दोन तलाव होते. गोपाळ शेट्टी यांनी नियम धाब्यावर बसवत राणी लक्ष्मीबाई जॉगर्स पार्क शेजारील नैसर्गिक स्रोत बुजवले. तलाव बुजवण्यासाठी मुंबई महापालिका किंवा राज्य सरकार यांच्यापैकी कोणाचीही परवानगी घेण्यात आलेली नाही. हे उघडकीस आल्याने त्या विरोधात एडविन ब्रिटो आणि इतरांकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
यात राज्य सरकार, उपनगर जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते. या याचिकेवर तब्बल आठ वर्षे सुनावणी चालली. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यावर गुगल मॅप व फोटोवरून त्या ठिकाणी तलाव असल्याचे सिद्ध होत असल्याने दोन्ही तलाव होते तसे पुन्हा करावेत असे आदेश एप्रिल २०१६ मध्ये दिले होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या मीरा कामत यांनी दिली.गोपाळ शेट्टी यांनी आमदार निधीमधून तलाव बुजवून पार्क व मैदान उभारले आहे. मात्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आपले खर्च झालेले 50 लाख रुपये दिले तरच आपण ही जागा परत करू, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमच्या विरोधात न्यायालय आदेश देऊ शकत नाही, असे सांगून विभागातील नागरिकांची दिशाभूल केली होती. गोपाळ शेट्टी हे खासदार असल्याने व त्यांची या विभागात दहशत असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकारने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नव्हती.

- Advertisement -

अवमान याचिका दाखल केल्यावर सरकारी यंत्रणा लागल्या कामाला

न्यायालयाने दोन वर्षांपूर्वी आदेश देऊनही सरकार कारवाई करत नसल्याने एप्रिल महिन्यात अवमान याचिका दाखल केली होती. अवमान याचिका दाखल केल्यावर सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत.
बुधवारी सकाळी प्रचंड पोलीस बंदोबस्तात जिल्हाधिकारी कार्यालय व म्हाडा यांनी संयुक्त कारवाई करत बुजवण्यात आलेला तलाव पुन्हा खोदण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता पाऊस न पडल्यास पुढील १५ ते २० दिवस खोदकाम सुरू राहील. पाऊस न पडल्यास पिचिंग करून तलाव पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती दिली.

या ठिकाणी एक तलाव होता. तो पावसाळ्यात भरायचा. त्या जागेवर झाँसी की राणी उद्यान बनवण्यात आले होते. आज या ठिकाणी कारवाई झाल्याने उद्यान उजाड झाले आहे. गोपाळ शेट्टी यांच्यावर आक्षेप असल्यास मैदान एखाद्या संस्थेला केअर टेकर म्हणून द्यायला हवे होते.
– गणेश बरे, नागरिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -