कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब गरजू चिंतीत झाले आहे. या संकट समयी ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
कोरोना विषाणूच्या विरोधात जो लढा आपण सारे जण देत आहोत. या संकटाच्या काळात शासनातर्फे गरीब गरजू नागरीकांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे. या परिस्थितीत ३०० युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय वीज ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल अशी भावना व्यक्त करत याबाबत त्वरित निर्णय घेण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.