पुणेः कर्नाटक पॅर्टन देशात चालणार नाही. देशात फक्त मोदी पॅर्टन चालणार आहे. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकमध्ये भाजपला २८ पैकी २५ जागा मिळतील, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील कार्यक्रमात केला.
आपली लोकसेभेची लढाई नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांची नाही किंवा गावाची नाही. आपली लढाई बुथची आहे. बुथ सक्षम असेल तर निवडणूक जिंकणे सहज शक्य आहे. सर्वसामान्य जनता हिच आपली शक्ती आहे. हिच मोदीजींची शक्ती आहे. महाराष्ट्रात कर्नाटक पॅर्टन चालणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांचा मावळा भाजपला नक्की वियय मिळवून देईल, असा विश्वास फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.
फडणवीस म्हणाले, पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. येणारे सहा महिने आणि त्या पुढचे सहा महिने महत्त्वाचे आहेत. कोणतीही लालसा मनात ठेवू नका. पद मागू नका. समिती मागू नका. मी घर आणि पद सोडायला तयार आहे. पार्टीने मला काय दिलं यापेक्षी मी पार्टीला काय दिलं याचा विचार करुन कामाला लागा. विजयानंतर प्रत्येकाच्या त्यागाचाच विचार केला जाणार आहे. सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवा. सर्वसामान्यांची कामे करा. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल काळजी करु नका, असेही फडणवीस यांनी सांगितले.
फडणवीस यांनी महाविकास आघाडीवरही निशाणा साधला. अडीच वर्षे आपण भ्रष्टाराची सरकार बघितले. या सरकारचं विसर्जनही बघितलं. दाऊदशी संंबंध असलेल्यांना मंत्रीपद मिळाली. विशेष म्हणजे संजय राऊतांना जामीन मिळाला तर संविधानाचा विजय आणि नबाव मलिकांना जामीन मिळत नाही तर टीका, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
पोपट कधीच मेला आहे हे आता उद्धव ठाकरे यांनी मान्य करावं. आमचं सरकार संविधानिक आहे. कायद्याच्या चौकटीतच स्थापन झाले आहे. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. परत निवडूनही येणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. सचिन वाझेला परत घेण्यास माझा विरोधच होता. तसा शेराही मी फाईलवर लिहिला होता. महाविकास आघाडीच सरकार आल्यानंतर लगेचच वाझेला सेवेत घेण्यात आलं. वाझे सेवेत आल्यानंतर मातोश्री आणि वर्षावर असायचा, असा आरोपही फडणवीस यांनी केला.