विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याचा मला आनंद वाटत आहे. ते दिल्लीत जाऊन चांगले काम करतील. त्यांना माझ्याकडून शुभेच्छा, असे मत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे शनिवारी व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी ‘देवेंद्र फडणवीस फार काळ विरोधी पक्षनेते किंवा माजी मुख्यमंत्री राहणार नाहीत,’ असे मत नोंदवले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना जयंत पाटील यांनी वरील प्रमाणे प्रतिक्रिया नोंदवली.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर नागरिकत्व कायदा भूमिकेवरून मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भूमिकेत बदल झाला आहे का, अशी विचारणा केली असता सीएए, एनआरसी याविषयी मी बोलणे उचित ठरणार नाही. याबाबत उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबतची भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. बाकी, आमचे महा विकास आघाडीचे सरकार व्यवस्थित काम करीत आहे. त्यामध्ये कोणतीही धुसफूस नाही, असा निर्वाळा पाटील यांनी यावेळी दिला.
अर्थिकदृष्ट्या कमकुवत ब्राह्मण समाजाला मुख्य प्रवाहात आणणार ब्राह्मण समाजातील अर्थिकदृष्ट्या कमकुवत असणार्या घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यशासनाचे प्रयत्न राहतील. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समाजातील प्रमुख नेतृत्वांने पुढे यावे. या वाटचालीत राज्यकर्त्यांचे सर्वतोपरी सहकार्य ब्राह्मण समाजाला राहील, असे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी येथे शनिवारी दिले. सर्व शाखा ब्राह्मण अधिवेशनाचे उद्घाटन येथे दसरा चौकात मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.