नाशिकः शिंदे गटाचे आमदार व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर स्वाभिमानी संघटना आज बिऱ्हाड मोर्चा काढणार आहे. या मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्हा बॅंकेच्या कर्जवसुली विरोधात हा मोर्चा असणार आहे. या मोर्चात कर्जवसुलीचा पालकमंत्री भुसे यांना शेतकरी जाब विचारणार आहेत.
सिन्नर, चांदवाड. निफाड, दिंडोरी या तालुक्यातील शेतकरी या मोर्चासाठी एकवटले आहेत. बिऱ्हाड मोर्चाला मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी व्हावेत यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. कृती समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांनी या मोर्चाचे नियोजन केले आहे. सर्व राजकीय पक्ष मतभेद बाजूला ठेवून या मोर्चासाठी एकवटले आहेत. त्यामुळे हा मोर्चा भव्य होण्याची शक्यता आहे.
नाशिक जिल्हा बॅंकेने ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमीनीचा लिलाव सुरु केला आहे. या शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर बॅंकेने मोठ्या प्रमाणात व्याज आकारले आहे. जमीनीच्या मूळ किमतीपेक्षा कर्जाची रक्कम अधिक झाली आहे. त्यानंत बॅंकेने कर्जाची पतरफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमीनीचा लिलाव सुरु केला आहे. जमीन लिलावाच्या प्रक्रियेमुळे शेतकरी भूमिहीन होण्याची भीती आहे. राज्य शासनाने याप्रकरणात हस्तक्षेप करावा. ६२ हजार शेतकऱ्यांच्या जमीनीचा लिलाव थांबवावा. नाशिक जिल्हा बॅंकेला राष्ट्रीय बॅंकेप्रमाणे ओटीएस करण्याचे आदेश द्यावेत यासह विविध मागण्यांसाठी हा बिऱ्हाड मोर्चा निघणार आहे.
या मोर्चाची अधिक माहिती देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप म्हणाले, मंत्री दादा भुसे नाशिक जिल्ह्याचे पालक आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी सोडवणे अपेक्षित आहे. ६२ हजार शेतकऱ्यांना मंत्री दादा भुसे न्याय देतील. मंत्री दादा भुसे यांच्या घरावर मोर्चा काढूनही न्याय मिळाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.