सध्या सगळीकडे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या तयारीची लगबग सुरू असून, बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाच्या तयारी देखील सर्वच मिठाईच्या दुकानात सुरू आहे. तसेच वेगवेगळी मंडळ देखील बाप्पाच्या प्रसादाची तयारी करताना दिसत आहेत. मात्र उत्सवाच्या काळात कुणालाही खव्यातून किंवा बाप्पाच्या प्रसादामधून विषबाधा होऊ नये म्हणून अन्न आणि औषध प्रशासन विभाग देखील कामाला लागल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून आपलं महानगरला मिळाली आहे. दरम्यान मंगळवारी अन्न व पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रालयामध्ये सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांनी सतर्क रहा असे आदेशच अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे.
राज्यभरात २२२ अधिकाऱ्यांची करडी नजर –
गणेसोत्सवाच्या काळात राज्यभरात २२२ अधिकाऱ्यांची मंडळामध्ये ठेवण्यात येणारा प्रसाद तसेच दुकानातील खवा याच्यावर लक्ष असणार असून, विशेष मुंबईमध्ये २२ फूड सेफ्टी ऑफिसर आणि १२ असिस्टंट कमिशनर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आमचे २५ फू़ड सेफ्टी अधिकारी आणि १२ असिस्टंट कमिशनर त्यांच्या विभागात मंडळांसोबत १३ तारखेच्या आधी बैठक घेणार असून, मंडळांना आणि दुकानांना फूड सेफ्टीचे नियम समजवणार आहेत. तसेच काही माव्याच्या दुकानात भेसळ आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाईही करण्यात येणार आहे. यासोबतच आम्ही मावा मिठाईचे नमुने घेणार आहोत. तसेच मंडळांना देखील सुचना देणार आहोत. आमचे २५ फुड सेफ्टी ऑफिसर आणि १२ असिंस्टंट कमिशनर त्यांच्या विभागात लक्ष ठेवणार असून काही चूकीचे आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. – शैलेश आढाव, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन विभाग
- Advertisement -
पुण्याप्रमाणे सगळीकडे लागणार फलक –
सध्या पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्यावतीने फलक लावून मंडळाना आवाहन करण्यात आले असून, असेच आवाहन मुंबईसह इतर ठिकाणी करण्यात येणार असल्याची माहिती आपलं महानगरला मिळाली आहे
नक्की काय आहेत फलकातील सूचना –
- सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यावसायिकांना नियमांचे पालन करणे बंधन कारक
- प्रसाद तयार करताना उत्पादनाची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी.
- प्रसादासाठी लागणारा कच्चा माल/अन्न पदार्थ परवाना धारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावा.
- प्रसादासाठी वापरणारी भांडी स्वच्छ व झाकण असलेली असावी.
- आवश्यक तेवढाच प्रसाद तयार करावा, तसेच त्यात वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.
- अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी तपासणीसाठी आले तर त्यांना योग्य सहकार्य करावे.
- खवा, माव्याची वाहतूक करताना रेफ्रिजरेटर वाहनातून करावी.
- जुना, शिळा, साठवलेला खवा प्रसादासाठी वापरू नये.