मुंबई : पोलादपूरनजीक मुंबई – गोवा महामार्गावर सोमवारी संध्याकाळी ऑटोरिक्षा आणि डंपरच्या झालेल्या अपघातात चालकासह तीन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे. याबाबतची माहिती रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ट्विटद्वारे दिली.
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील कशेडी घाटात ट्रक आणि रिक्षा यांचा अपघात झाला असून या अपघातात चार व्यक्तींच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ₹ ५ लक्ष मदत जाहीर केली आहे.
— Uday Samant (@samant_uday) November 7, 2022
चोरळी गावाच्या वळणावरील रस्त्यावर वाळू वाहून नेणारा ट्रक बाजूने जाणार्या रिक्षावर कलंडला आणि या अपघातात रिक्षा चालक, एक विवाहितेसह दोन तरुणींचा गुदमरुन जागीच मृत्यू झाला. रिक्षा आणि वाळू ट्रक ही दोन्ही वाहने रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जात होती. हालिमा अब्दुल सलाम पोपेरे, (23 वर्षे, नांदवी), अमन उमर बहुर (46 वर्षे, गोरेगाव, रिक्षाचालक), आसिया सिद्दीक (20 वर्षे, गोरेगाव) आणि नाजमीन मूफीद करबेलकर (22 वर्षे, सवाद) अशी मृतांची नावे आहेत.
मुंबई -गोवा महामार्गाचे काम गेली काही वर्षे संथगतीने सुरू असून त्याच रस्त्याचा भाग असलेल्या घटनास्थळाचे काम अर्धवट स्थितीत आणि अरुंद आहे. या ठिकाणी यापूर्वी अनेक छोटे-मोठे अपघातही घडले आहेत. मात्र या रस्त्याची स्थिती सुधारलेली नाही. सोमवारी याच रस्त्यावर वाळू सदृश्य ग्रीट वाहून नेणारा एक ट्रक कलंडला आणि बाजूनेच जाणार्या रिक्षावर त्यातील वाळू वेगाने पडून चालकासह तीन प्रवासीही अडकले आणि अखेरीस रिक्षाबाहेर येण्यास न जमल्याने त्यांचा गुदमरुन मृत्यू झाला.
आता तरी प्रशासनाला जाग येईल का?
मुंबई-गोवा मार्गावरुन मार्गस्थ होताना वाहनचालकांना कमालीचा त्रास होत असल्याच्या आणि अपघाताच्या घटना घडत असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या जातात. पण प्रशासनाकडून मात्र याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. सोमवारी याठिकाणी आणखी एक मोठा अपघात घडलाच. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येईल का? असा सवाल स्थानिकांकडून करण्यात येत असून हा रस्ता लवकर करण्याचीही मागणी केली जात आहे.