राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सणमारंभ, लग्नकार्यांवर बंधने आली आहेत. लग्नसाठी केवळ २५ लोकांना आमंत्रण देण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केवळ २ तासातच लग्न उरकरावे लागत आहे. त्यामुळे अनेक लग्न करणाऱ्या मंडळींचा हिरमोड झाला आहे. मात्र तरीही विवाहउत्सुक मंडळी कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांच्या मनाप्रमाणे लग्न लावत आहेत. असाच एक प्रकार नागपूरमधून समोर आला आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असलेल्या नागपूर जिल्ह्यात चक्क वाजत गाजत लग्नाची भलीमोठी वरात काढल्याचे पहायला मिळाले आहे. मात्र हे नवरदेवाला चांगलचं महागात पडले. ५० हजारांचा दंड घेऊन पोलिसांनीच नवरदेवासह १०० जणांची वरात काढली. सध्या या वरातीची सर्वत्र जोरदार चर्चा आहे.
४ मे रोजी नागपूरातील लालगंज गावातील हरबान सिंह समुद्रे याचे लग्न होते. नागपूरात कोरोनाचा कहर वाढत असतानाही लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली. लग्न घरी करायचे ठरले होते. संध्याकाळी लग्न पार पडले. संध्याकाळी लग्नाची वरात काढण्यात आली. वरातीसाठी बँड,बाजा, घोडा मागण्यात आला. वऱ्हाड्यांनी बँड बाजाच्या जोरावर चांगलाच ताल धरला होता. लग्नासाठी २० लोकांची उपस्थितीची परवानगी असताना १०० हून अधिक लोकांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यात सोशल डिस्टन्सिंगचा पूर्ता फज्जा उडवला गेला.
धुमधडाक्यात सुरु असलेल्या लग्नाच्या वरातीची पालिका उपद्रव विरोधी पथकाला माहिती मिळाली. नियमांचे उल्लंघन केल्याचे नवरदेवाला सांगण्यात आले. मात्र नवरदेवासह वऱ्हाड्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. पोलीस दंडाची पावती त्यांच्या हातात देऊन निघाले. नवरदेव दुसऱ्या दिवशी वकील घेऊन पोलिस स्टेशनला गेला मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी कोरोनाची नियमावली वाचून दाखवल्याने आपली चूक झाल्याचे कबूल करत नवरदेवाला ५० हजारांचा दंड भरावा लागला.
हेही वाचा – कोरोनाला धूळ चारत ७४ वर्षीय पठ्ठ्याची आठ दिवसात कोरोनावर मात