पुण्यात ३० जानेवारीला पार पडलेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाज सडका बनलाय, असे वक्तव्य करणाऱ्या शरजील उस्मानीविरोधात पुणे पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शरजील उस्मानीचा या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कालच (मंगळवारी) राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवास यांनी उस्मानीवर कायदेशीर कारवाई करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर आता भाजप युवा मोर्चाचे प्रदीप गावडे यांनी उस्मानीविरोधात पुण्यातील स्वारगेटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पुण्यातील स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली. या परिषदेमध्ये शरजील उस्मानी याने हिंदू समाजाविषयी अपमानजक आणि आक्षेपार्ह वक्तव्य केली. त्यामुळे प्रदीप गावडे यांनी उस्मानीच्या या भाषणामुळे भावना दुखावल्या प्रकरणी २ जानेवारीला संध्याकाळी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार उस्मानीच्या भाषणाची चौकशी करून त्यानंतर त्याच्याविरोधात भारतीय दंड संहिता १५३ (अ) अंतर्गत दंगल भडकावण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून उस्मानीविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती.
या परिषदेमध्ये शरजील उस्मानी नाहीतर अरुंधती रॉय, प्रशांत कनौजिया यांनी देखील समजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारची भाषा वापरली होती. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांनी शरजील उस्मानीला अटक केली होती. तो सध्या जामिनावर बाहेर होता. या पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये ते वक्ता म्हणून उपस्थित राहिला होता.
हेही वाचा – उस्मानीला अटक करा, अन्यथा रस्त्यावर येऊ!