घरमहाराष्ट्रशाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या 15 लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी मेळावे - दीपक केसरकर

शाळेत पहिले पाऊल टाकणाऱ्या 15 लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी मेळावे – दीपक केसरकर

Subscribe

 

मुंबईः  राज्य शासनाने ‘पहिले पाऊल- शाळापूर्व तयारी अभियान’ हाती घेतले आहे. या अंतर्गत राज्यातील 65 हजार शासकीय शाळांमध्ये येत्या जूनमध्ये पहिलीच्या वर्गात पहिले पाऊल टाकणाऱ्या सुमारे 15 लाख मुलांची शाळापूर्व तयारी करून घेण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंगळवारी वरळीच्या मनपा शाळेतून तर 27 तारखेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांदा जि.प.शाळेतून मंत्री केसरकर या अभियानाचा शुभारंभ करतील.

- Advertisement -

मंत्री केसरकर म्हणाले, या अभियानात मातांचा सहभाग उल्लेखनीय आहे. सावित्रीबाई फुलेंचा वारसा त्या खऱ्या अर्थाने पुढे नेत आहेत. त्यांच्या सहकार्यानेच हे अभियान यशस्वी होत आहे. जागतिक स्तरावर हे सिद्ध झाले आहे की, वयाच्या आठव्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूचा 80 टक्के विकास होतो. यासाठी बालशिक्षणावर भर देणे आवश्यक आहे. तसेच चांगली पिढी घडवायची असेल तर शिक्षणाबरोबरच मुलांचे संगोपन उत्तम होणेही गरजेचे आहे. या उद्देशाने 30 एप्रिल पर्यंत राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या त्यांच्या माता या अभियानाच्या केंद्रस्थानी असणार आहेत. सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीचा उपयोग करून माता गटांच्या मदतीने शालेय प्रवेशासाठी मुलांची तयारी करून घेतली जाणार आहे. मागील वर्षापासून शालेय शिक्षण विभागाने मातांची वाडी/ वस्ती निहाय छोटे-छोटे गट तयार करून त्यांना सतत मार्गदर्शन केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर जवळपास 2.6 लाख माता-गटांची स्थापना केली गेली आहे. तेच या अभियानाला पुढे घेऊन जात आहेत. या अभियानात अंगणवाडी सेविकांचे देखील मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया सुलभ व्हावी, या अभियानाच्या निमित्ताने बालकांच्या तयारीसाठी विकसित केलेले साहित्य माता गटांना एकाच वेळेत देता यावे, यासाठी राज्यातील सर्व 65 हजार शासकीय शाळांमध्ये शाळापूर्व तयारीचे पहिले मेळावे 23 ते 30 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत. तसेच दुसरे मेळावे जून महिन्यात घेण्यात येतील. असे शाळापूर्व तयारी मेळावे इतक्या मोठ्या प्रमाणात राज्यभर आयोजित करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

- Advertisement -

अभियानासाठी प्रशिक्षण शिबीर

राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्यामार्फत आणि प्रथम या संस्थेच्या सहकार्याने प्रशिक्षण दिल्यानंतर जिल्हा, तालुका आणि ब्लॉक स्तरावर या अभियानासाठी अत्यंत उत्तमरित्या प्रशिक्षण व अंमलबजावणीची तयारी मोहीम पार पडली आहे. आतापर्यंत 35 जिल्हे, 289 ब्लॉक, 794 केंद्राच्या स्तरावर प्रशिक्षण सत्र पार पडले आहे. यामध्ये 81,768 अधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

‘मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी मातांनी दररोज थोडा वेळ द्यावा’

पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी नेहमीच तत्पर असतात. सर्व मातांनी दररोज थोडा वेळ आपल्या मुलांच्या शाळापूर्व तयारीसाठी द्यावा, यासोबतच गावातील सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद, गावातील तरूण स्वयंसेवक यांनी देखील याकामी सहकार्य करावे, असे आवाहन केसरकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -