घरमहाराष्ट्रअतिवृष्टीबाधितांना तातडीने मोफत धान्य, केरोसिन देण्याचा निर्णय

अतिवृष्टीबाधितांना तातडीने मोफत धान्य, केरोसिन देण्याचा निर्णय

Subscribe

गहू, तांदूळ, डाळ आणि केरोसिन दिले जाणार असल्याची अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळांची घोषणा

अतिवृष्टीमुळे आलेला महापूर आणि दरडी कोसळून मोठ्या प्रमाणावर जिवितहानी झाली आहे, तसेच शेकडो नागरीक बेघर झाले आहेत. या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी तातडीने १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ किलो डाळ आणि दुप्पट शिवभोजन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळांनी घेतला.

नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. काही ठिकाणी दरडी कोसळून अनेक व्यक्ती मृत्यमुखी पडले, तर कित्येक बेपत्ता झाले आहेत. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्यांशी आपण बोललो असल्याचेही भुजबळांनी सांगितले. पावसाचा जोर कमी होत असल्याने मदतीला वेग येतो आहे. दरम्यान, अनेक गावांमध्ये घरे पाण्याखाली गेल्याने साठवलेले अन्नधान्य खराब झाले आहे. अनेक कुटुुंब निराधार झाले आहेत. अशा नागरिकांना ज्यांना गहू नको असेल त्यांना तांदूळ दिला जाईल. परिस्थिती सुरळीत होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -

आपत्तीग्रस्त भागात मोफत शिवभोजन थाळीच्या इष्टांकात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. याबाबत आज तातडीने आदेश काढण्यात येणार असून आदेशाची वाट न बघता तातडीने मदत कार्य सुरु करण्यात यावे असे यावेळी छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

पुर परिस्थीतीमुळे अनेक जिल्ह्यांत लाईट नाही अशा ठिकाणी मोफत केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र वाहून गेले आहे किंवा पाण्यात आहे तेथे इतर ठिकाणावरून शिवभोजनाचे पाकिटे वितरीत करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. पाकिटांच्या वितरणासाठी त्याचप्रमाणे लाईट नसलेल्या ठिकाणी किंवा शिवभोजन अँपसाठी कनेक्टिव्हिटी नसलेल्या ठिकाणी थाळीच्या नोंदणीसाठी स्थानिक पातळीवर तहसीलदारांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करावा अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

या सहा आपत्तीग्रस्त जिल्ह्यात प्रति कुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ आणि पाच लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्नधान्य वाटप करण्याबाबतच्या ८ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार ही मदत दिली जाणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे गहू नको असेल त्यांना गव्हा ऐवजी तांदूळ दिले जातील. प्रत्येक कुटुंबाला ५ किलो डाळ देण्याबाबत सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी बोलताना मंत्री भुजबळ यांनी राज्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीमुळे दुर्दैवाने काही नागरिकांना दुर्घटनांमध्ये आपला जीव गमवावा लागला आहे. त्या मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याची भावना व्यक्त करतानाच मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -