यवतमाळमध्ये एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. लग्न सोहळ्यावरून परत येत असताना काळाने घाला घातला. राळेगाव आगारची बस यवतमाळवरून अमरावतीला जात होती. तसेच कारमधून तीन कुटुंबातील सात जण यवतमाळकडे येत होते. त्यादरम्यान कार एसटी बसवर धडकली.
या भीषण अपघातात कार चालवित असलेला अभियंता राधेश्याम इंगोले, त्याची आई रजनी इंगोले यांचा जागीच मृत्यू झाला. तर यवतमाळ रुग्णालयात उपचारादरम्यान वैष्णवी गावंडे आणि सारिका चौधरी या दोघी दगावल्या. अपघातानंतर तातडीने मदत पोहोचविण्यात आली.
नेर येथील रुग्णसेवक शंकर भागडकर, नाना घोंगडे, राजेश खोडके, प्रमोद राणे यांनी प्रसंगावधान राखत जखमींना तातडीने नेर शासकीय रुग्णालयात आणले. तेथून यवतमाळ येथील रुग्णालयात पोहोचविण्यात आले. जखमींवर उपचार केल्यानंतर डॉक्टरांनी दोन महिलांना नागपूर रेफर करण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा : अब्दुल सत्तारांवर कारवाई करा, राज्यपाल कोश्यारींचं मुख्यमंत्री शिंदेंना पत्र