राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अॅड. अनिल परब आणइ संबंधित अधिकारी यांची बैठक बोलावली होती. ही बैठक चार तासानंतर संपली. या बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली याची माहिती अॅड. अनिल परब यांनी दिली.
शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अॅड. अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधताना बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती दिली. “गेले काही दिवस एसटीचा संपा सुरु आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांचे, ग्रामीण भागातील लोकांचे नुकसान होत आहे. शरद पवार यांनी मला आणि अधिकाऱ्यांना बोलावलं होतं. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आमच्याकडून सगळी परिस्थिती समजून घेतली. याच्यावर वेगवेगळे काही मार्ग निघू शकतात, या मार्गांच्या बाबतीत तपासणी केली,” अशी माहिती अॅड. अनिल परब यांनी दिली.
“एसटीचा संप मिटवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टीकोनातून, एसटीची आताची आर्थिक परिस्थिती भविष्यात एसटी कशी रुळावर येईल त्यासाठीच्या उपाययोजना, संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, त्यासंदर्भात शरद पवार यांनी आमच्याशी चर्चा केली,” असं सागत आम्ही त्यांना जी माहिती हवी आहे ती माहिती दिली. त्यांनी देखील त्या माहितीचा सखोल अभ्यास केला, असं अॅड. अनिल परब यांनी सांगितलं. एसटी कर्मचाऱ्यांचा सुरु असलेला संप यावर वेगवेगळे मार्ग, पर्याय काढून कामगारांचं आणि जनतेचं समाधान करता येईल यावर सविस्तर चर्चा केली, अशी माहिती देखील अॅड. अनिल परब यांनी दिली.
अॅड. अनिल परब यांनी पुढे बोलताना विलिनीकरणाचा मुद्दा समिती समोर आहे, समितीसमोर सरकारने काय बाजू मांडावी याबाबत चर्चा झाली, अशी माहिती दिली. विलिनीकरणाबाबतच अहवाल जो काही येईल तो आम्ही स्वीकारु. बाकीच्या राज्यात महामंडळ कसा चालतो, बाकीच्या राज्यात कर्मचाऱ्यांना किती पगार मिळतो या सगळ्याचा विचार आज आम्ही केला, असं अॅड. अनिल परब यांनी सांगितलं.