घरमहाराष्ट्रएल्गार परिषदेचा तपासासाठी पोलीस अधिकार्‍याची पूर्णवेळ नियुक्ती

एल्गार परिषदेचा तपासासाठी पोलीस अधिकार्‍याची पूर्णवेळ नियुक्ती

Subscribe

भीमा-कोरेगाव प्रकरणी माओवाद्यांशी संबध असल्याचा आरोप करत पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. या पाचही संशयितांच्या विरोधात तपास करुन आरोपपत्र दाखल करण्यासाठी आम्हाला आणखी ९० दिवसांची मुदत मिळावी, असा अर्ज पुणे पोलिसांकडून शनिवारी दाखल करण्यात आला होता.

एल्गार परिषदेविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांचा पूर्ण वेळ तपास करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना इतर सर्व कामातून मोकळीक देण्यात आली आहे. एल्गार परिषदेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने त्याला पूर्ण वेळ पोलीस अधिकारी देण्याचा निर्णय शहर पोलीस दलाने घेतला आहे. पवार यांच्या जागी स्वारगेट सहायक आयुक्तपदी विशेष शाखेचे रवींद्र रसाळ यांची नेमणूक करण्यात आली आहे. शनिवार वाड्यावर ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसर्‍या दिवशी कोरेगाव -भीमा येथे हिंसाचार झाला होता. याप्रकरणी एल्गार परिषदेत भडकावू भाषणे दिल्याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपवण्यात आला.

या प्रकरणात पोलिसांनी हजारो कागदपत्रे, ई मेल, पेनड्रॉईव्ह, हार्ड डिक्स जप्त केल्या आहेत.बंदी असलेल्या माओवादी संघटनांशी संपर्क करताना त्यांच्या थिंक टँकने कोड लॅग्वेजचा वापर केला आहे़ त्याशिवाय नुकताच अटक केलेल्यांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात अपिल केले आहे. त्यामुळे या न्यायालयातील तारखांना उपस्थित राहण्यासाठी पोलीस अधिकार्‍यांना जावे लागणार आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास बारकाईने व्हावा, यासाठी शिवाजी पवार यांना त्यांच्या कडील इतर जबाबदार्‍या काढून घेण्यात आली आहे. त्यांना पूर्ण वेळ या गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

पाचजणांना नजरकैद

या गुन्ह्याचा तपास करत असताना एल्गार परिषदेच्या आडून शहरात माओवादी विचार पसरविण्याचा हेतू असल्याचे निष्पन्न झाले. परिषदेच्या आयोजनासाठी माओवादी संघटनांकडून पैसा पुरविण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. या प्रकरणी सुरुवातीला पुणे पोलिसांनी देशभरातील विविध शहरात कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या घरावर छापे घातले. त्यातून मिळालेल्या माहितीवरुन जून मध्ये नागपूर, मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे घालून पाच जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात यामागील देशव्यापी कट पुढे आला. राजीव गांधी यांच्या प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे उघड झाले.



काडतुसे बाळगल्याप्रकरणी एकास अटक

पुणे | जिल्ह्यातील दौंड तालुक्यात काही दिवसांपूर्वी विनापरवाना गावठी कट्टे आढळण्याची घटना ताजी असतानाच विनापरवाना गावठी कट्टा व तीन जिवंत काडतुसे बाळगणार्‍या एका सराईत गुन्हेगारास यवत पोलिसांनी अटक केली आहे.  पारगाव येथील मुख्य चौकात सापळा पोलिसांनी निळकंठ राऊत (38) याला जेरबंद केले.पोलीस नाईक मंगेश कदम व गजानन खत्री हे पेट्रोलिंग करीत असताना गुप्त खबर्‍यांमार्फत पारगाव परिसरात एक सराईत गुन्हेगार फिरत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून निळकंठ राऊत यास पाठलाग करून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी बनावटीचा कट्टा व तीन जीवंत काडतुसे आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून त्याच्याविरुद्ध अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राऊत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर व परिसरात विविध ठिकाणी घरफोड्या, अवैध शस्त्र बाळगणे, दहशत माजविणे आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisement -

वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे | मुळशी येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांच्या वसतिगृहात एका अकरावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. निश्चय गर्ग (17, रा. जि. पुणे, मूळ रा. चंदीगड), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. निश्चय हा मुळशीतील आंग्रेवाडी येथील इंडस इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होता. तो मुळचा चंदीगडचा असून शाळेतील वरिष्ठ मुलांच्या वसतीगृहात राहत होता. दरम्यान त्याने राहत्या रूमच्या खिडकीला इलेक्ट्रीक वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, पौड पौलिसांनी घटनास्थळाची तपासणी करून ससून रुग्णालयात निश्चयचे शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.


 रबर प्लास्टिक कचर्‍याला आग लागली

पुणे | बर्ड व्हॅली समोरच्या खुल्या मैदानात टाकलेल्या रबर प्लास्टिक कचर्‍याला आग लागली. आग मैदानात लागली असल्याने सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र, रबर प्लास्टिकच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट हवेत पसरले होते. बर्ड व्हॅली समोरच्या खुल्या मैदानावर टाकलेल्या रबर प्लास्टिक कच-याला अज्ञात इसमांनी आग लावली. आग मोठ्या स्वरूपात लागल्याने धुराचे लोट हवेत पसरले. तसेच आसपासच्या परिसरात धूर पसरला. यावरून स्थानिक नागरिकांनी अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच संत तुकाराम नगर अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी झाला. काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझविण्यात आली. मोकळ्या मैदानात आग लागल्याने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -