गणेशोत्सव आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्यामुळे राज्यात सर्व ठिकाणी लगबगीचे वातावरण आहे. एकीकडे विविध बाजारपेठा गणपतीच्या मूर्ती आणि सजावटीच्या सामानांनी भरुन गेल्या आहेत. तर दुसरीकडे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी आपले गाव गाठण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. मुंबईसह कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या अक्षरश: हाऊसफूल झाल्यात. तर रेल्वे गाड्यांही खच्च भरून जातायत. मात्र गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चारकमान्यांवर यंदाही कोरोना आणि पावसाचे विघ्न आहे. त्यामुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात प्रवासासाठी निघण्यापूर्वी सर्व नियम आणि पावसाचा अंदाज तपासून निघा.
सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार अलर्ट
रत्नागिरी, रायगडसह सिंधुदुर्गातही मुसळधार पावसाने अक्षरक्ष: थैमान घातले आहे. धो-धो कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओसंडून वाहत असून अनेक रस्ते, दुकानं आणि घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही गावांचा पावसामुळे संपर्क तुटला आहे. यात गुहागर जिल्ह्यातही पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर आणखी दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज आहे. यात रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोकणात मुसळधार पावसाचा कहर कायम असणार आहे. सिंधुदुर्गमधील शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शिवगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनूसार जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.देवघर घरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.@MahaDGIPR @InfoDivKolhapur @samant_uday pic.twitter.com/s9DCPmgr3q
— DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG (@InfoSindhudurg) September 7, 2021
‘हा’ मार्ग अवजड वाहतूकीसाठी बंद
मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता १६ टन किंवा १६ टनापेक्षा जास्त आहे, अशा जड अवजड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक ८ सप्टेंबरपासून ते १० सप्टेंबरपर्यंत रात्री ८ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. मात्र पेट्रोल, डिझेल, दूध, गॅस सिलेंडर भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरु राहिल.
मुंबई – गोवा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सर्व वाहने ज्यांची वजन क्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त आहे, अशा जड अवजड वाहने, ट्रक, मल्टी ॲक्सल, ट्रेलर वाहनांची वाहतूक 8 सप्टेंबर रोजी 1 वाजलेपासून 10 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे. @MahaDGIPR
— DISTRICT INFORMATION OFFICE, SINDHUDURG (@InfoSindhudurg) September 7, 2021
अलगीकरणाचे नियम बदलले
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई महानगर प्रदेशातून मोठ्या प्रमाणात चाकरमानी येऊ लागल्याने व जिल्ह्यात अचानक गर्दी वाढल्याने उद्भवलेली स्थिती हाताळण्यासाठी अलगीकरणाच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनमधून सिंधुदुर्गात येणाऱ्यांनाच आता संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येणार असून ज्या व्यक्ती कंटेनमेंट झोन वगळता इतर क्षेत्रातून येणार आहेत त्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येईल. अलगीकरणातील व्यक्ती गावात वा शहरात कोठेही फिरणार येणार आहेत.
मात्र अलगीकरणात असलेल्या व्यक्तीमध्ये करोना सदृष्य आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला तातडीने जवळच्या कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करावे व वैद्यकीय अधिकारी यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या समन्वयाने स्वॅब तपासणी केली जाईल.
आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही
मुंबई, पुण्याहून गणेशभक्तांची रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या सीमेवर कोणतीही चाचणी होणार नाही. फक्त गावपातळीवर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी गृहभेट देऊन प्राथमिक आरोग्य चाचणी केली जाणार आहे. १८ वर्षाखालील मुलांना देखील कोणत्याही प्रकारची बंधने नसून कोकणात विना व्यत्यय प्रवेश मिळेल.
कोकणवासियांनी टोलमधून मुक्ती
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी वाहनांची कागदपत्र सादर केल्यानंतर त्यांना टोलमधून सूट देण्याचा पास दिला जाणार आहे. हे पास ठाण्याच्या एलआयसी कार्यालयाजवळील मुंबई नाशिक पूर्व द्रूतगती मार्गालगतच्या प्रादेशिक परिहवन कार्यालयाच्या खिडकी क्रमांक १६ आणि १८ येथून वितरीत केले जाणार आहेत. ते संबंधितांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून गर्दी न करता या कार्यालयातून घेऊन जाण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी केले आहे.