पोटापान्यासाठी घरापासून लांब असलेल्या चाकरमान्यांचे पाय आणि मन ज्याच्यासाठी ओढ़ घेते तो गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन पोहचला आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणी माणूस सज्ज झाला आहे. प्रत्येक घरा-घरात बाप्पांच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. खरेदीसाठी बाजारपेठाही सजल्या असून मुसळधार पावसाची तमा न बाळगता खरेदी साठी लगबग सुरु आहे. गणेशोसत्वासाठी जिल्ह्यात आजपर्यंत तब्बल एक लाखाच्यावर चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात ६९ हजार ३६२ घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस खात्याने सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळून साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
१० सप्टेंबर पासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. आजपासून हरतालिका व्रताने गणपती उत्सवास सुरुवात होणार आहे. त्यामुळे गणपतीच्या स्वागतासाठी जोरदार तयारी सुरू असून प्रत्येकाच्या घरा-घरात साफसफाई, रंगरोगोटी झाली असून गणेशमूर्ती शाळांमधील बाप्पा ही विराजमान होण्यासाठी आतुर आहेत.गणपतीची रंगरगोटीही अंतिम टप्प्यात असून सध्या पाऊस सुरू असल्याने एक दोन दिवस अगोदरच लोकांनी गणपती घरी आणण्याची लगबग सुरू आहे. गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठावर थोडासा परिणाम दिसून येत आहे. तरीदेखील पावसाची तमा न बाळगता बाप्पाच्या तयारीसाठी खरेदीकरिता बाजारपेठा मध्ये गर्दी दिसून येत आहे.
गतवर्षी गणेशोत्सवाच्या वेळी कोरोनाचा संसर्ग वाढला होता त्यामुळे चाकरमानी कमी प्रमाणात आले होते तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध असल्याने कोरोनाच्या सावटाखालीच गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. मात्र यावर्षी कोरोनाचा संसर्ग कमी असल्याने चाकरमानी मोठ्या संख्येने जिल्ह्यात दाखल होत आहे. दोन लाखांच्यावर चाकरमानी येतील अशी शक्यता असून आतापर्यंत एक लाखाच्या वर चाकरमानी जिल्ह्यत दाखल झाले आहेत. अशी माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात रेल्वे ,एसटी ,खाजगी बस आणि मिळेल त्या वाहनाने गणेशभक्त जिह्यात दाखल होत आहेत. गणेशोत्सवसाठी येणाऱ्या चाकरमाऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी जिल्ह्याच्या सर्व प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रेल्वे व बस स्थानकांवरही पोलिस बंदोबस्त व तपासणीसाठी आरोग्य पथके तैनात केली आहेत. जिह्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव सद्या कमी होत असला तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही तसेच जिल्हाबाहेरून लोक मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कोविडचे नियम पाळले पाहिजेत तसेच भजने, फुगड्या घालायला निर्बंध नाहीत परंतु गर्दी टाळायला हवी. गणपतीच्या आगमनाच्या वेळी व विसर्जनाच्या वेळी मिरवणूका काढू नये सण साजरा करा परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण मिळू नये यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
यावर्षी गणेशोत्सवात कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने उत्साहाचे वातावरण आहे. परंतु सतत पडणाऱ्या पावसामुळे गणेशभक्ताचा थोडा हिरमोड झालेला आहे दरम्यान हवामान खात्याचाअतिवृष्टीचा इशारा कायम असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
Ganesh Chaturthi 2021 : कोकणात जाताय? मग या गोष्टी आत्ताच तपासून घ्या